मुंबई : सर्वांच्याच मनासारखं होत नसतं. प्रकाश आंबेडकरांनी हट्ट सोडावा, असा सल्ला उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना दिला आहे. बुधवारी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक पार पडली. मात्र, अजूनही जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना राऊतांनी हे वक्तव्य केले.
संजय राऊत म्हणाले की, "आघाड्यांमध्ये सर्वांच्याच मनासारखं होत नसतं. आम्ही जेव्हा भाजपसोबत युतीमध्ये होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नव्हतं. आता आम्ही महाविकास आघीडमध्ये आहोत. आघाडीमध्ये प्रत्येकाने आघाडीधर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे."
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तो हट्ट सोडलेला आहे. शिवसेनेने अनेक आपल्या महत्त्वाच्या जागा आघाडीमध्ये सोडलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांशी उत्तम चर्चा झाली. काही जागांसंदर्भात पुढे चर्चा होणार आहे. त्यामुळे काल काहीच घडलं नाही असं सांगणं बरोबर नाही. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचं पुर्ण समर्थन करायचं आम्ही ठरवलं आहे," असेही ते म्हणाले.