नमो महारोजगार मेळावा म्हणजे समृद्धीची मंगल प्रभात!

ठाणे येथील नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

    06-Mar-2024
Total Views |
Namo Maharojgar Melawa News

ठाणे:
मंगल प्रभात म्हणजे एक चांगली सुरुवात! या राज्यामध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी सुरुवात केली त्याबद्दल मी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन करतो. रोजगार हा तरुणांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. आज जवळपास ३० हजारापेक्षा जास्त तरुण या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि ५ ते ६ हजार उमेदवारांची त्यामधून निवड झाली आहे आणि उर्वरित तरुणांना देखील रोजगार मिळेपर्यंत मंगलप्रभातजी, आपण थांबणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ठाणे येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले "हे आपले भाग्य आहे कि आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखा जनसामान्यात वावरणारा, त्यांच्या व्यथा जाणणारा आणि त्यांच्या भल्यासाठी अविरत काम करणारा नेता लाभला. राज्यातील युवक युवतींना रोजगार मिळावा या भावनेने त्यांनी अतिशय समर्पितरित्या काम केले आहे आणि म्हणून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जोपर्यंत या मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या शेवटच्या उमेदवाराला रोजगार मिळत नाही, तोपर्यंत आपण प्रयत्न करू आणि या उपक्रमाला यशस्वी करू!"

महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नानिन्यता विभागामार्फत सर्वत्र विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावे राबवण्यात येत आहेत. नागपूर, नगर, लातूरनंतर आज ठाण्यामध्ये मॉडेला मिल कंपाऊंड, वागळे इस्टेट येथे विभागस्तरीय रोजगार मेळावा संपन्न झाला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कॅबिनेट मंत्री उदय सामंत, खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर मेळावा दि. ६ आणि ७ मार्च असे दोन दिवस घेतला जाणार असून येथे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. आजच्या दिवशी ३० हजारपेक्षा जास्त तरुणांनी आपला सहभाग नोंदवला तर ५ ते ६ हजार उमेदवारांची त्यातून निवड झाली, आणि त्यांना नेमणुकीचे प्रमाणपत्र मिळाले. १५०० पेक्षा जास्त कंपनी आणि उद्योजकांनी या मेळाव्यात आपला सहभाग नोंदवला आहे.कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतातील पहिल्या संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उद्घाटन देखील करण्यात आले. या अकॅडमीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात २ हजार मुलांना प्रशिक्षण आणि नोकऱ्या देण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.