केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा राहूल गांधींना टोला
05-Mar-2024
Total Views | 97
मुंबई : राहूलयान १९ वेळा प्रक्षेपित झालं पण पोहोचलंच नाही. त्यामुळे आता २० व्यांदा प्रयत्न सुरु आहे, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहूल गांधींना लगावला आहे. अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून मंगळवारी जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संमेलनात ते बोलत होते.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "मोदीजी भविष्यातील भारतासाठी तयार आहेत. २०३० मध्ये भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनवणार आहे. २०३५ पर्यंत अंतराळात स्टेशन तयार करायचं आहे, २०३६ मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करायचं आहे आणि २०४० मध्ये भारतीय व्यक्तीला चंद्रावर पाठवून मून मिशन यशस्वी करायचं आहे. एकीकडे मोदीजी चंद्रावर चंद्रयान प्रक्षेपित करत आहे तर दुसरीकडे सोनिया गांधी २० व्यांदा राहूल गांधींना लॉन्च करण्याचा प्रयोग करत आहेत. हे राहूल यान १९ वेळा प्रक्षेपित झालं पण पोहोचलंच नाही. त्यामुळे आता २० व्यांदा प्रयत्न सुरु आहे."
"जो पक्ष आपल्या पक्षातच लोकशाही मानत नाही आणि परिवारवादाने कार्य करते तो पक्ष देशाच्या लोकशाहीला मजबूत करु शकेल का? मोदीजींच्या विरोधात एकत्र आलेले इंडी आघाडीतील सर्वच पक्ष परिवारवादी आहेत. सोनिया गांधींना राहूल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे, ममतादीदींना त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. यांच्यापैकी तुमच्यासाठी कुणीच नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "तुम्हाला वाटत असेल की, २०२४ ची निवडणुक ही मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी असेल. परंतू, या गैरसमजामध्ये राहू नका. येणारी निवडणुक ही २०४७ मध्ये आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्याची निवडणुक आहे. २०४७ मध्ये व्यासपीठावर खूप कमी लोकं असतील. पण व्यासपीठापुढे बसलेले सर्व युवक असतील. ही निवडणुक भारताच्या तरुणांची आणि भारताच्या भविष्याची आहे."
"महाराष्ट्रात तीन चाकांचा ऑटो चालतो ज्याचं नाव महाविकास आघाडी आहे. या ऑटोचे तिन्ही चाक पंक्चर आहेत. पंक्चर ऑटो महाराष्ट्राचा विकास करु शकत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राचा विकास करू शकतो," असेही ते म्हणाले आहेत.