- २८ मार्चला अर्ज भरणार; "मविआ"चा चार जागांचा प्रस्ताव धुडकावला
25-Mar-2024
Total Views | 47
मुंबई : महाविकास आघाडीसोबत सूर जुळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. २८ मार्च रोजी प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मविआने त्यांना पाठविलेला चार जागांचा प्रस्ताव त्यांनी धुडकावला आहे.
याविषयी भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, मी मविआला त्यांच्या चार जागा परत करीत आहे. आम्हाला चार जागा दिल्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र प्रत्यक्षात आम्हाला अकोला आणि उर्वरित दोन जागा ऑफर केल्या. त्यामुळे त्यांनी खोटे बोलणे थांबवावे. आमच्या मागणीला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला कुठेतरी सामावून घ्यायचे, म्हणून त्यांचा प्रयत्न दिसतो आहे. त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. मविआमध्येच मतभेद आहेत. १५ जागांचा तिढा कायम आहे. काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली, पण मतभेद असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्यांच्याकडून पुन्हा प्रस्ताव आला, तर पुन्हा चर्चा करू, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
आंबेडकर सोबत नसले तरी जिंकू - संजय राऊत
शिवसेनेची लोकसभेची पहिली यादी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी जाहीर होईल. १५ ते १६ जागा आम्ही जाहीर करू. प्रकाश आंबेडकर वंचितचे नेते आहेत. ते आमच्यासोबत रहावेत, असा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली, हे दुर्दैवी आहे. लोकसभेसाठी आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला, हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे. जागा वाटपात एखाद्-दोन गोष्टी मागे पुढे होऊ शकतात. त्यांना प्रस्ताव मान्य आहे की नाही हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत नसले, तरीही आम्ही निवडून येऊ. ते सोबत असते तर मताधिक्य वाढले असते. पण आम्ही परावलंबी नाही. जनता आमच्या पाठिशी आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.