प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा, म्हणाले "शिवसेना आणि वंचितची युती..."
23-Mar-2024
Total Views | 127
मुंबई : शिवसेना आणि वंचितची युती आता पुर्वीप्रमाणे राहिलेली नाही, असा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीने आम्हाला चार जागांचा प्रस्ताव दिलेला नाही, असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "शिवसेना आणि वंचितची आघाडी आता राहिलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये जायचं असल्यास आपण दोघांनी आधी बसून जागा ठरवल्या पाहिजे, असं मी अनेकदा त्यांना बोललो होतो. पण यातली एकही गोष्ट झाली नाही. ते स्वतंत्रपणे जाऊन त्यांच्याशी बोलून आलेत. त्यामुळे आता ती जुनी युती राहिलेली नाही. आता महाविकास आघाडीशी आमचं जमलं तर आमची युती आहे, नाहीतर नाही," असे ते म्हणाले.
"आम्हाला महाविकास आघाडीने कधीही चार जागांचा प्रस्ताव दिलेला नाही. त्यांनी तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातली एक जागा अकोल्याची होती. ती जागा आम्ही त्यांना परत घेण्यास सांगितलं. त्यामुळे त्यांनी आम्हाला दोनच जागांचा प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये १५ जागांवर भाडणं आहेत. यावर त्यांचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही पुढे काहीही करु शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचं १५ जागांचं कोडं उलगडतं की, नाही हे बघण्यासाठी २६ तारखेपर्यंत थांबणार आहोत," असेही ते म्हणाले.
ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "प्रकाश शेंडगेंनी नवीन पक्ष रजिस्टर केला आहे. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केली. यावर आम्ही त्यांना सांगितलं की, आमचंच घोंगडं तिथे भिजत पडलेलं आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही. आमची दीड तास चर्चा झाली असून याबद्दल आणखी चर्चा करण्याचे आम्ही ठरवले आहे," असे त्यांनी सांगितले.