"ठाकरेंनी भाजपशी युती करु नये यासाठी राऊतांना काँग्रेसकडून सुपारी!"
21-Mar-2024
Total Views | 155
मुंबई : उद्धव ठाकरेंनी कधीही भाजपशी युती करु नये म्हणून संजय राऊतांना काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच स्वार्थाचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. राणेंनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी कधीच भाजपशी युती करु नये यासाठी संजय राऊतांना काँग्रेसकडून सुपारी मिळाली आहे. त्यातूनच ते दिवसरात्र भुंकण्याचं काम करत आहेत आणि त्यांना लवकरच याचे परिणाम कळतील. भाजप आणि पंतप्रधान मोदींनी कधीही स्वार्थाचं राजकारण केलेलं नाही. परंतू, स्वार्थाचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. ज्यांनी महाराष्ट्र स्वत:च्या मेहुण्याला विकण्यासाठी काढला त्यांनी दुसऱ्यांना स्वार्थी म्हणण्याची हिंमत करु नये."
"संजय राजाराम राऊत, त्यांचे मालक आणि मालकीन मुलाला वाचवण्यासाठी दिल्ली दौरे करतात. कुठल्याही अटीशर्ती न करता आम्हाला भाजपशी युती करायची आहे, अशा मागण्या करतात. कुठल्याही परिस्थितीत मोदीजींसोबत परत जाण्याची ईच्छा ठेवतात. तर दुसरीकडे, संजय राऊतांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सातत्याने भुंकायला सांगतात. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणं बंद न केल्यास त्यांच्या मालकाची आणि मालकाच्या मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर आणेन की, दिवसरात्र औरंगजेब आठवेल," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "ज्या औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं तोडत त्यांचा द्वेष केला त्याच्याशी पंतप्रधान मोदींची तुलना करणं हा देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान करण्यासारखं आहे. काँग्रेसच्या काळात जेवढी हिंदूंची मंदिरं अंधारात टाकली गेली त्या धार्मिक स्थळांचा विकास पंतप्रधान मोदींनी केला आहे. ५०० वर्षांपासून असलेली हिंदू समाजाची राम मंदिराची मागणीही त्यांच्याच काळात पूर्ण झाली आहे," असेही ते म्हणाले.