"राज ठाकरे उघडपणे अमित शाहांना भेटले, पण काहीजण..."; नीलम गोऱ्हेंचा टोला
21-Mar-2024
Total Views | 167
मुंबई : राज ठाकरेंनी उघडपणे अमित शाहांची भेट घेतली. काही लोकं लपूनछपून भेटतात, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे नेते राज ठाकरेंनी घेतलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या भेटीनंतर मनसे महायूतीत सहभागी होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता नीलम गोऱ्हेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वचन होतं. त्याप्रमाणे अनेकदा राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी झालेल्या आहेत. राज ठाकरेंनी सरकारला अनेक सकारात्मक सल्ले देण्याचं काम केलेलं आहे. काही सरकारच्या लोकांनी त्यांना सन्मान दिला पण काही लोकं ऐकत नाही. या पार्श्वभूमीवर खरंतर ही भावनिक, सामाजिक आणि राजकीय भेट आहे, असं मला वाटतं. त्यामुळे यातून आताच कुठला निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही."
"राजकारणात संवाद, समन्वय, सहकार्य आणि मुद्यांवर एकजूट या सहकार्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या असतात. राजसाहेब ठाकरे यांनी मराठा भाषेच्या प्रश्नासाठी आणि अनेक मुद्यांवर आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते स्वत: योग्य तो निर्णय घेऊ शकतात. त्यांनी अमित शाहांची उघड भेट घेतलेली आहे. काही लोकं राजकारणात गुपचूप भेटी घेतात. राजकारणात कुणीही कुणाला भेटून चर्चा करु शकतं. त्यामुळे राज ठाकरेंशी संवाद करुन महाराष्ट्राचं हित झालं तर त्याचं मी स्वागतच करते," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "बेरजेचं राजकारण हा शब्द यशवंतराव चव्हाणांनी तयार केला. काही लोकांचं राजकारण हे उण्याचं असतं. कुणालातरी कशातून उणं करायचं असं असतं. यात महाराष्ट्राचं हित नाही. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे," असेही त्या म्हणाल्या.