नेत्रदानाच्या जोडीला अवयवदानाविषयीही समाजात हल्ली बर्यापैकी जनजागृती झालेली दिसते. ट्रान्सप्लाटंच्या सर्जरीसाठी तर अवयवदान हे वरदान ठरावे. पण, तरीही अवयवदानाविषयी लोकांच्या मनात भीती, गैरसमज आणि एकप्रकारची नकारात्मकतेची भावना दिसून येते. त्यानिमित्ताने अवयवदानाचे महत्त्व आणि अवयवदानामुळे जीवनदान मिळालेल्या अशाच काही उदाहरणांचा उहापोह करणारा हा लेख...
मनुष्याचे शरीर हे पंचतत्त्वाने बनले आहे. त्यात प्राण किंवा आत्मा असतो व त्यामुळे श्वासाची क्रिया नियमित चालते. त्याचप्रमाणे इतर अवयवांचे कार्यदेखील निर्विघ्नपणे चालू राहते. मृत्यू होणे म्हणजे शरीरातील प्राणतत्व नाहीसे होणे. श्वासाची क्रिया बंद होते. इतर अवयवांचे कार्य बंद होते. सजीव माणसाचे निर्जीव माणसात रुपांतर होते. प्रत्येक समाजाच्या रीतीरीवाजाप्रमाणे अग्नी दिला जातो व त्याने सजीव माणसाचे पंचमहाभूतात विलीनीकरण होते.मनुष्याचे शरीर म्हणजे असंख्य पेशींचा शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करणारा समूह आहे. आपल्या कळत-नकळत शरीरात असंख्य प्रक्रिया घडत असतात. या सर्व प्रक्रियांवर मनाचा प्रभाव असतो. मन निरोगी असेल, तर शरीर निरोगी राहते. मन अस्वस्थ असेल, आहार आणि जीवनपद्धती व्यवस्थित नसेल, तर आजारपणास सुरुवात होते. आजार जास्त प्रमाणात असल्यास शरीराच्या काही अवयवांचे कार्य बिघडते. हृदय, यकृत किंवा किडनीचे आजार बळावल्यास हे अवयव निकामी होऊन जातात व जीवास धोका निर्माण होतो, अशा रुग्णांना योग्य वेळेस योग्य व्यक्तीचे अवयव दान मिळाले, तर त्याला जीवनदान मिळते.
अवयवदानाबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया.
गेल्या दोन दशकात किडनी, लिव्हर व हृदय यांच्या ट्रान्सप्लांटच्या अनेक शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. अनेक रुग्णांचे यामुळे प्राण वाचले आहेत. या तिन्ही अवयवांच्या ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया आता चांगल्यापैकी यशस्वी होऊ लागल्या आहेत. अवयवदान एक चळवळ म्हणून उभी राहू पाहत आहे. अवयव दानाचे व्यापारीकरण होऊ नये म्हणून अनेक कडक नियम तयार करण्यात आले आहेत.दोन दशकापूर्वी नेत्रदान प्रचलित होते. यात कार्नियाचा भाग वापरला जातो. डोळ्यात फूल पडल्यामुळे, डोळ्यास इजा झाली असल्यामुळे गेलेली दृष्टी ही ‘कॉर्निया ट्रान्सप्लांट’ शस्त्रक्रियेने परत येऊ शकते. अनेक वरिष्ठ नागरिक नेत्रदानाचा अर्ज भरून ठेवतात. मृत्यूपश्चात नेत्रदान केले जाते. यासाठी अनेक ‘एनजीओ’ चांगले काम करत आहेत. नेत्रदानाबद्दल समाजात बर्यापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. परंतु, इतर अवयवदानाबद्दल समाजात बर्यापैकी अज्ञान आहे. अवयवदान जीवंतपणीदेखील करू शकतो. आपल्या शरीरात दोन किडनीज असतात. यातील एका किडनीवर पण शरीराचे कार्य चालू शकते. कुटुंबात जरुर पडल्यास किडनी दान करून अनेक वर्षे डायलिसीसवर जगणार्या रुग्णाचे प्राण वाचविले जाऊ शकते. मधल्या काळात किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रकियेत अनेक अनियमितता आढळल्या आहेत.
आपल्या देशात फक्त जवळच्या नातेवाईकांची किडनी अवयवदानात घेता येते. बोगस सर्टिफिकेट तयार करून भ्रष्ट मार्गाने काही हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. सिंगापूर, हॉगकाँग या देशात ट्रान्सप्लांटचे नियम शिथिल आहेत. आपली बरीच राजकीय नेतेमंडळी या देशांमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करून येतात. मृत व्यक्तींच्या किडनीचादेखील अवयवदानासाठी उपयोग होतो. ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यास अशा मृत व्यक्तीची किडनी काढून रिनल ट्रान्सप्लांटसाठी वापरली जाते. सरकारी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. किडनी ट्रान्सप्लांटसाठी रुग्णाच्या व डोनरच्या रक्ताच्या अनेक चाचण्या करण्यात येतात. या सर्व चाचण्या नॉर्मल आल्यावरच शस्त्रक्रिया केली जाते.किडनी ट्रान्सप्लांटमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. डायबेटीसकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे किडनीवर परिणाम होतात व पुढे किडनी निकामी होऊन नियमित डायलिसीस करावे लागते. इतरही अनेक कारणांनी किडनी निकामी ठरू शकते, अशा वेळेस किडनी दान हे सर्वश्रेष्ठ दान ठरू शकते.
आमच्या वर्गमित्राच्या बायकोची किडनी फेल झाली. माझ्या मित्राने त्याच्या बायकोला किडनी दान केले आणि तिचा जीव वाचविला. आज हे जोडपे सुखाचा संसार करत आहे. माझ्या एका मित्राच्या मेव्हणीने त्याला किडनी दान केले. प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना तरुणपणीच किडनीचा आजार होऊन किडनी निकामी झाल्या. त्यांच्या आईने किडनी दान करून त्यांचे प्राण वाचविले. बरे झाल्यावर डॉ. लहाने यांनी हजारो गोरगरीब रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत केले. एक व्रत म्हणून त्यांनी ही रुग्णसेवा केली.माझे वर्गमित्र आणि प्रसिद्ध नेफ्रोलॉजीस्ट डॉ. भरत शहा यांनी अवयवदानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. ’नर्मदा किडनी फाऊंडेशन’ या ‘एनजीओ’ची स्थापना करून त्यामार्फत अनेक किडनीच्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले जाते. अवयवदानाबद्दल जनजागृतीदेखील फाऊंडेशनतर्फे मोठ्या प्रमाणात केली जाते. विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण अशा कार्यक्रमाद्वारे जनजागृती घडविण्यात येते.
लिव्हर ट्रान्सप्लांट
सिरोसीस ऑफ लिव्हर, पोर्टल हायपरटेंशन यांसारख्या आजारात लिव्हरचे कार्य बिघडते. अनेक रुग्णांना या आजारात रक्ताच्या उलट्या होतात. रक्तातील प्लेटलेट पेशी कमी होतात. यातील अनेक रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज लागते. ‘ब्रेन डेड’ मयताचे लिव्हर मिळविण्यासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी काऊंसिलिंग केले जाते. अशा दु:खद प्रसंगीदेखील अवयवदानाची परवानगी देणारे नातेवाईक खरोखरच वंदनीय आहेत. माझे मित्र श्री परब यांनी नमूद केलेला त्यांच्या नातेवाईकांचा किस्सा येथे देत आहे. ६१ वर्षीय गीता (नाव बदलले आहे.) या प्रचंड डोकेदुखीसाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेल्या. चक्कर येऊन त्या दवाखान्यातच कोसळल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनीदेखील गीता यांचे प्राण वाचविता आले नाही. त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले. अकाली व अचानक निधनामुळे दु:खी झालेल्या नातेवाईकांचे डॉक्टरांनी सांत्वन केले व त्यांना अवयवदानासाठी सल्ला दिला. नातेवाईकांनी या दु:खातून स्वत:ला सावरून अवयवदानास परवानगी दिली. त्यांच्या सहकार्यामुळे पुढील २४ तासांत त्या हॉस्पिटलमध्ये किडनी, लिव्हर व हार्ट ट्रान्सप्लांटच्या तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
एक किडनी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आली व तेथे आणखी एक ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. केवढे हे श्रेष्ठदान! आज या घटनेस सुमारे दहा वर्षे झाली असतील. गीताच्या रुपाने चार रुग्णांना जीवनदान मिळाले. गीता यांना माझा त्रिवार प्रणाम.
आमच्या शेजारी राहणार्या ५० वर्षीय हंसाबेन यांचाही त्याग सर्वोच्च आहे. त्यांच्या ३० वर्षे वयाच्या पुतण्यास ‘सिरोसिस ऑफ लिव्हर’ झाला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. हंसाबेन यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदार्या बाजूला सारून यकृतदानकेले. आज या घटनेस दोन वर्षे झाली. हंसाबेन आणि त्यांचा पुतण्या कृतार्थ जीवन जगत आहेत.काही वर्षांपूर्वी कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. अन्वय मुळे यांचा सत्कार मुलुंडमध्ये करण्यात आला. हार्ट ट्रान्सप्लांटच्या त्यांनी अनेक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या व अनेक रुग्णांना नवजीवन दिले. अवयवदान करणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व डॉ. अन्वय मुळे यांचे मन:पूर्वक आभार.अवयवदानाबद्दल आजही समाजात गैरसमज आहेत. अनेक जणांचा याला विरोध आहे. देवाने दिलेले शरीर सर्व अवयवानिशी पंचतत्त्वात विलीन व्हावे, असी त्यांची इच्छा असते. पण, तरीही अवयवदानांबद्दल जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.
डॉ.मिलिंद शेजवळ