मराठी चित्रपटांची कथा हाच ‘हिरो’ : मनोज जोशी

    16-Mar-2024
Total Views |
Talk with actor manoj joshi
 

हिंदी, मराठी, गुजराती नाटक, चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते मनोज जोशी यांचा ‘जन्मऋण’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने मनोज जोशी यांच्याशी दै. ’मुंबई तरूण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद.

कांचन अधिकारी दिग्दर्शित आणि निर्मित ‘जन्मऋण’ या चित्रपटाबद्दल बोलताना मनोज जोशी म्हणाले की, “कोकणातील एका सामान्य दाम्पत्याची ही कथा असून, त्यातील नायक (साकारणारे मनोज जोशी) प्राथमिक शाळेत संस्कृत शिकवणारा शिक्षक आहे. त्याच्यासोबत त्याची धर्मपत्नी म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोने असून, त्यांना एक मुलगा आहे. अशा सुखी कुटुंबात एक दिवस त्यांच्या मुलामुळे संकट येते; त्यामुळे आई-वडिलांना काय हालअपेष्टा भोगाव्या लागतात, हे या चित्रपटात दाखवले आहे. मुळात लहानाचे मोठे केलेल्या मुलांनाच ज्यावेळी आईवडील नकोसे होतात, तेव्हा काय परिस्थिती उद्भवते, हे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.“

पुढे बोलताना मनोज जोशी म्हणाले की, ”वृद्धाश्रम हे गेल्या काही वर्षांत मुलांच्या हाती लागलेले असे साधन आहे, जिथे ते त्यांच्या जबाबदार्‍या झटकून आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतात. त्यामुळे ज्या पाल्यांना आपले आईवडील हे ओझे वाटतात किंवा त्यांचा भार वाटतो, त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा हा चित्रपट आहे. त्याचसोबत जे पालक आपल्या मुलांना अतिमोकळीक किंवा त्यांचे अतिलाड करतात आणि परिणामी त्यांना त्यांचा वृद्धापकाळ हा वृद्धाश्रमात घालवावा लागतो, त्यांनाही त्यांची चूक या चित्रपटातून दाखवलीन आहे.”’जन्मऋण’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पुन्हा एकदा महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडणारा चित्रपट करण्याचे अहोभाग्य मिळाल्याची भावना मनोज जोशी यांनी व्यक्त केली.

मराठी चित्रपटांविषयी विचारले असते, जोशी म्हणाले की, ”मराठी चित्रपटांची एक महत्त्वाची खासियत म्हणजे, त्यांची कथाच त्यांचा हिरो असतो. पण, तरीही प्रेक्षक मराठी चित्रपट पाहत नाही, अशी तक्रार केली जाते. याबद्दल मला असं वाटतं की, मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे जर उभारली गेली; तसेच एक पडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रिन थिएटर्सच्या उभारणीसाठी आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. केवळ मराठी चित्रपटांसाठीच राखीव चित्रपटगृहे असतील तर नक्कीच प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळतील,” अशी खात्री जोशी यांनी व्यक्त केली. तसेच ”मोकळ्या जागेत ‘बलून थिएटर्स’ मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत उभारल्यास, त्याचाही फायदा होईल,“ असे मत जोशी यांनी मांडले.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, हिंदीपेक्षा कमी बजेटमध्ये विषय उत्तमरित्या हाताळण्याची कसब मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांकडे असल्याचेही त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. मराठी चित्रपट न चालण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण सांगताना जोशी म्हणाले की, ”चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, पायरेटेड चित्रपट व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य सोशल मीडिया साईट्सवर उपलब्ध होतात किंवा काही दिवसांनी तो ’ओटीटी’वर प्रदर्शित होतो, तिथे तो पाहिला जातो. परिणामी, प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत पोहोचत नाही आणि निर्मात्यांच्या खिशाला कात्री बसते. त्यामुळे पायरसी थांबली पाहिजे,” असे मत जोशी यांनी ठामपणे मांडले.

“हिंदी चित्रपट अगदी फार पूर्वीपासून दाक्षिणात्य, हॉलिवूड चित्रपटांचे रिमेक किंवा डब करत आहेत. अगदी चित्रपटांमधील गाणीदेखील रिमेक केली जातात. त्यामुळे अलीकडे जर का दाक्षिणात्य कलाकार, दिग्दर्शक हिंदीतील कलाकारांसोबत काम करत असतील, तर केवळ हिंदी चित्रपटसृष्टी नाही, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी मोठी होत आहे, हा भाग आपण पाहिला पाहिजे,” असे हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या एकत्रिकरणावर मनोज जोशी यांनी त्यांचे मत मांडले.

रसिका शिंदे-पॉल