जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाजहिताच्या दृष्टीने पंचपरिवर्तनावर होणार चर्चा
13-Mar-2024
Total Views |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (Pratinidhi Sabha RSS) १५ ते १७ मार्च या कालावधीत नागपूर येथे होत आहे. त्यापार्श्वभूमीवर संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपूर येथे होत आहे. स्मृतिभवन परिसर, रेशिमबाग येथे दि. १५,१६,१७ मार्च या कालावधीत प्रतिनिधी सभा पार पडेल. देशभरातून एकूण १५२९ कार्यकर्ते प्रतिनिधी सभेला अपेक्षित आहेत. दरम्यान संघ शताब्दी वर्ष, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापश्चात होणाऱ्या कार्याबाबत विशेष प्रस्ताव, समाजहिताच्या दृष्टीने होणाऱ्या पंचपरिवर्तनावर चर्चा अशा विविध विषयांवर बैठकीत विचार विनिमय होतील. रा.स्व.संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवार, दि. १३ मार्च रोजी प्रतिनिधी सभेविषयी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी मंचावर पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया देखील उपस्थित होते.
सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सह सरकार्यवाह यांच्यासह राष्ट्र सेविका समिति, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजप अशा वेगवेगळ्या ३६ संघटनांचे अखिल भारतीय अध्यक्ष, महामंत्री, संघटन मंत्री, कार्यकर्ता, प्रतिनिधी यावेळी उपस्थित असतील. देशभरात संघाच्या चालणाऱ्या कार्याची समिक्षा यावेळी करण्यात येईल. तसेच संघाच्या कार्यविस्ताराच्या दृष्टीने आगामी योजनांवर चर्चा होईल आणि त्यासंबंधीत काही निर्णयही यावेळी घेतले जातील.
देशभरात सध्या संघाच्या ६८ हजार नियमित शाखा सुरु आहेत. संघ शताब्दी वर्षानिमित्त ती संख्या एक लाखापर्यंत घेऊन जाण्याचे ध्येय संघाने समोर ठेवले आहे. त्यासंदर्भातही प्रतिनिधींमध्ये चर्चा होतील. संघ शताब्दी वर्षाच्या दृष्टीने आखलेल्या योजना, आपापल्या प्रांतात घडणाऱ्या गोष्टी अशा विविध गोष्टींबाबतही यावेळी चर्चा होईल.
सुनील आंबेकर यावेळी म्हणाले, “श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न झाला. त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच दिसतील. समाजाने सकारात्मक दृष्टीने वाटचाल करावी याकरीता हा एक महत्त्वपूर्ण क्षण होता. त्यानिमित्ताने एक प्रस्ताव प्रतिनिधी सभेत मांडला जाणार आहे. प्रतिनिधी सभेच्या समारोप सत्रानंतर सरकार्यवाह याविषयी सविस्तर माहिती देतील.”
मे २०२४ मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री-शताब्दी (३००) वर्षाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने वर्षभरात करता येणाऱ्या काही कार्यक्रमांविषयी प्रतिनिधी सभेदरम्यान चर्चा होईल. त्यासोबतच ‘पंचपरिवर्तना’संदर्भातही सध्या चर्चा होत आहे. समाजाला सोबत घेऊन समाज परिवर्तनाचे कार्य हाती कसे घेता येईल यावर विचारमंथन यावेळी केले जाईल. त्यानिमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संघटनांना सोबत घेऊन समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेण्याबाबत विचार विनिमय सध्या सुरु आहे.
सरसंघचालकांच्या देशव्यापी प्रवासाची योजनाही तीन दिवसीय सभेदरम्यान निश्चित केली जाईल. सोबतच सरकार्यवाह यांच्या निवडीची प्रक्रियाही पूर्ण होईल. दि. १७ मार्च रोजी संघाचे सरकार्यवाह प्रतिनिधी सभेत चर्चा झालेल्या विषयांबाबत माध्यमांना संबोधीत करतील. दि. १४ मार्च रोजी एक दिवसीय प्रांत स्तरीय अ.भा.कार्यकारी मंडल बैठक होणार असून प्रांत संघचालक, प्रांत कार्यवाह, प्रांत प्रचारक बैठकीला उपस्थित असतील.