"यापुढे कोणत्याही 'रोहिंग्या'ला देशात प्रवेश नाही"
बांगलादेशच्या नेत्यांची रोहिंग्या घुसखोरांविरुद्ध स्पष्ट भूमिका
08-Feb-2024
Total Views |
ढाका : “आम्ही यापुढे कोणत्याही रोहिंग्यांना देशात येऊ देणार नाही. ते आधीच आमच्यासाठी ओझे बनले आहेत,” असे विधान बांगलादेशचे रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादिर यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "देशाला मिळणारी परदेशी मदत आधीच कमी झाली आहे, मग अशा लोकांना आधार कसा मिळणार?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
म्यानमारमध्ये गृहयुद्ध सुरु झाल्यापासून मोठ्या प्रमाणात रोहिंग्या घुसखोर बांगलादेशमध्ये येऊन राहत आहेत. यापुढे बांगलादेशने रोहिंग्यांना आश्रय देण्यास नकार दिला आहे. रोहिंग्यांमुळे बांगलादेशच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा बांगलादेशचे नेते करत आहेत.
बांगलादेशचे शरणार्थी मदत आणि प्रत्यावर्तन आयुक्त मोहम्मद मिझानुर रहमान म्हणाले की, "म्यानमारमधील जुंटा सरकार आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान शेकडो लोक बांगलादेशात प्रवेश करण्यासाठी म्यानमार सीमेवर जमले आहेत. त्यापैकी बहुतांश रोहिंग्या आहेत.
ते पुढे बोलताना म्हणाले, “बांगलादेश आधीच रोहिंग्यांच्या ओझ्याखाली दबला आहे. या घटनेला ७ वर्षे झाली असून अद्यापपर्यंत बांगलादेशात असलेल्या रोहिंग्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात आलेले नाही. आता हे लोक आमच्यासाठी, आमच्या सुरक्षेसाठी धोका बनले आहेत.