मुंबई उपनगरात प्रथमच बौद्ध महोत्सवाचे यशस्वी आयोजन!

बौद्ध विहाराच्या विकासासाठी १ कोटी रुपये निधीची पालकमंत्री लोढांची घोषणा

    26-Feb-2024
Total Views |

Lodha


मुंबई :
प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यात विविध ठिकाणी 'महासंस्कृती महोत्सव २०२४' अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने २४ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत सर्वोदय महाबुद्ध विहार, टिळक नगर, चेंबूर येथे बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भदंत राहुल बोधी होते. आपल्या भूमीला लाभलेला भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा दाखवणारा कार्यक्रम मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आला होता.
 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. भदंत राहुल बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सदर कार्यक्रमाचे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन केले. प्रसंगी मंत्री लोढा यांनी बौद्ध विहाराच्या विकासासाठी १ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली. मंत्री लोढा म्हणाले "मी प्रथम मंत्री झालो तेव्हा या वास्तूमध्ये दर्शनासाठी आलो आणि इथूनच माझ्या कार्याची सुरुवात झाली. राहुल बोधीजी यांच्याशी चर्चा केल्यानंतर बौद्ध विहाराच्या विकासासाठी आवश्यक कामांची माहिती समजली. त्या अनुषंगाने २ कोटी पेक्षा जास्त निधी या आधी दिला गेला असून, आता अजून एक कोटी निधी देत आहोत. बौद्ध विहाराच्या विकासासाठी जे काही सहकार्य लागेल ते सर्व देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत."
 
डॉ. भदंत राहुल बोधी यांनी सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंत्री लोढा यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. २ दिवस आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध महोत्सवात भीम गीते स्पर्धा, परिसंवाद, संविधान रॅली, धम्मपद भीम गीते यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सामाजिक संस्था परिचय, कला अविष्कार, महिला मेळावा, धम्म सन्मान आणि शाहीर जलसा असे कार्यक्रम बघायला मिळाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
 
संविधान रॅली कार्यक्रमात नागरिकांनी प्रचंड उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीमध्ये रथावर संविधानाची १० फुटी प्रतिकृती व सोबत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. हा कार्यक्रम भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.