लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात पुन्हा एकदा योगींचा बुलडोझर फिरला आहे. लखनौ विकास प्राधिकरण (एलडीए), लखनौ महानगरपालिका आणि पोलिसांनी लखनौच्या अकबरनगरमधील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरची कारवाई सुरू केली.
सोमवारी, दि.२६ फेब्रुवारी २०२४ अनेक चिन्हांकित बेकायदेशीर घरे आणि दुकानांवर बुलडोझर चालवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुकरेल नदीवर अकबरनगर १ आणि २ मध्ये अनेक घरे, मदरसे आणि दुकाने बेकायदेशीरपणे बांधण्यात आली आहेत. गेल्या वर्षी दि. २५ डिसेंबर रोजी एलडीएने अकबरनगरमधील अनेक बेकायदा घरे पाडल्याची माहिती मिळाली होती.
याआधी, उच्च न्यायालयाने २२ जानेवारी २०२४ पर्यंत अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती दिली होती. २०१७ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजूर केलेल्या आणि अकबरनगर I आणि II सह राजधानीच्या आजूबाजूच्या नदीच्या किनारी भागांच्या सुशोभीकरणावर लक्ष केंद्रित केलेल्या गोमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाचे हे आदेश होते.
उल्लेखनीय म्हणजे, उत्तर प्रदेश सरकार राज्यभरात बेकायदा अतिक्रमणांवर कडक कारवाई करत आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी, बरेली विकास प्राधिकरणाने (बीडीए) परिसरातील बेकायदेशीर वसाहती हटविण्याची मोहीम राबवली. पिलीभीत रस्त्यालगतच्या झुल्फिकार गावात पाच बेकायदा वसाहती बांधल्या जात होत्या. बीडीएच्या पथकाने अतिक्रमणाच्या ठिकाणी येऊन अवैध वसाहतींवर बुलडोझर फिरवला.