‘आर्टिकल ३७०’ चा ७५ वर्षांचा इतिहास!.. जाणून घ्या कसा आहे चित्रपट
24-Feb-2024
Total Views | 117
रसिका शिंदे-पॉल आणि श्रेयश खरात
५ ऑगस्ट २०१९ हा सर्व भारतीय नागरिकांसाठी सोनेरी दिवस होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी जम्मू-काश्मिरमधून ‘कलम ३७०’ हटवण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय महत्वपुर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेर्तृत्वात घेण्यात आला. १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. यामध्ये तत्कालीन राजकीय नेर्तृत्वाकडून काही चुका देखील झाल्या. त्यापैकीच एक मोठी चुक म्हणजे ‘कलम ३७०’. कलम ३७० मुळे देशाचा अभिन्न अंग आणि भारताचा मुकुट असलेलं जम्मू-काश्मिर भारतात एकिकृत होऊ शकले नाही. तर मग प्रश्न निर्माण होतो की, काश्मिरला देशापासून वेगळं पाडणारं ‘कलम ३७०’ का लागू केलं गेले? काय होते हे ‘कलम ३७०’? आणि ते कशाप्रकारे रद्द केले गेले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आदित्य धर निर्मित आणि आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात पाहता येणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात या चित्रपटाबदद्ल...
तर ‘कलम ३७०’ जम्मू-काश्मिरमधून हटवल्यानंतर राजकीय, सामाजिक, संविधानिक असे अनेक बदल तिथे झाले. आणि याच सगळ्यांचे वास्तवदर्शी आणि पुराव्यानिशी सादरीकरण करण्यात दिग्दर्शक आदित्य जांभळे आणि लेखक आदित्य धर, आदित्य जांभळे आणि अर्जून धवन यांना यश आले आहे. ‘कलम ३७०’ लागू केल्यानंतर आणि हटवल्यानंतर जम्मू-काश्मिरमधील नागरिकांचे मानसिक, शारिरिक, आर्थिक हाल-बेहाल कसे झाले याची संवेदनशीलता लक्षात घेत चित्रपटाच्या कथेतून मांडणी उत्तमरित्या करण्यात आली आहे. चित्रपट सुरु झाल्यापासून ते अगदी शेवटपर्यंत प्रेक्षकांना कुठेही रटाळवाणा वाटणार नाही याची विशेष काळजी दिग्दर्शकांनी घेतलेली जाणवते. बऱ्याच चित्रपटांची सुरुवात ही शेवटाला जोडणारी असते, परंतु, सादरीकरणात काही घटना या एकमेकांशी जोडण्यात लेखक किंवा दिग्दर्शक काही दुवे हरवून बसतात. परंतु, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या बाबतीत कुठेही घटना आणि त्यांचा संदर्भ हा जगावेगळा किंवा उगाच दाखवला असे वाटत नाही.
सामान्य प्रेक्षकांनी ‘आर्टिकल ३७०’ हटवण्याच्या आधीपासूनच काश्मिरमध्ये घडणाऱ्या घडामोडींची माहिती वृत्तपत्रांतून किंवा टेलिव्हिजनवर पाहिल्या असतील. परंतु, कलम ३७० हटवण्याच्या तीन-चार वर्षाआधीपासून काश्मिरमध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्यांचा दुवा आणि सरकारची कलम ३७० हटवण्याची योजना यांचा कसा संयोग होता हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे.
त्यामुळे ज्यांना थोडी काश्मिर समस्येची माहिती आहे ते या चित्रपटाशी जोडले जातील. ‘कलम ३७०’ हटवण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री या पडद्यासमोरील हिरोंनी कौतुकास्पद कामगिरी केलीच. परंतु, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यामागील कलाकार म्हणजे गुप्तहेर संस्था, भारतीय लष्कर, जम्मू-काश्मिर पोलिस दल आणि दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे कार्य केले ते दाखवण्यात या चित्रपटाला यश आले. खऱ्या अर्थाने हा चित्रपट पडद्यामागील नायकांना न्याय देतो. कमीत कमी ॲक्शन सिक्वेन्स आणि गाणी चित्रपटाचा संवेदनशील विषय भरकटवत नाहीत. कोणत्याही गंभीर विषयावर चित्रपट बनवताना दिग्दर्शकाला काही चित्रिकरण स्वातंत्र्य हे काही अंशी घ्यावे लागतेच, पण या चित्रपटाच्या बाबतीत कुठेही अतिशयोक्ती न करता केवळ विषयालाच मध्यस्थानी ठेवून त्याभोवतीची कथा मांडून प्रेक्षकांना त्यात गुंतवण्यात दिग्दर्शक खरा ठरला आहे. देशाच्या हिताशी निगडित असणाऱ्या कोणत्याही विषयाची मांडणी मनोरंजनातील विविध माध्यमांतून सादर करताना संशोधन हे फार महत्वाचे असते. या चित्रपटाच्या बाबतीत सत्य घटना, कायदेशीर बाबी, संविधानिक तरतूदी या सगळ्यांचे संशोधन करुन त्याचा घट्ट साचा तयार करण्यात आला आहे.
चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल भाष्य करायचे झाल्यास अभिनेत्री यामी गौतम, प्रिया मणि आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांनी उत्तम अभिनय केला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका करणारे अभिनेते किरण करमरकर यांचा अभिनय अधिक उत्तम होऊ शकला असता. याशिवाय चित्रपटातील संगीत हे देखील कथेला योग्य न्याय देणारे आहे. चित्रपटातील गाण्यांमुळे कुठेही चित्रपटाची कथा थांबत नाही, तर गाण्यातूनच कथा पुढे सरकत जाते. चित्रपट ज्यावेळी सुरु होतो त्यावेळी रंगसंगती ही थोडीशी काळ्या रंगाकडे झुकणारी दिसते; मात्र, जशी कथा सकारात्मक दिशेला वळत जाते तशी रंगांची छटा देखील खुलत जाते यासाठी एडिटर आणि सिनेमॅटॉग्राफर यांचे विशेष कौतुक करायला हवे.
या चित्रपटाच्या बाबतीत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, ‘कलम ३७०’चा इतिहास, त्या काळातील नेर्तृत्वांची त्यामागची भूमिका ते ५ ऑगस्ट २०१९ ला ‘कलम ३७०’ हटवण्याचा निर्णय हा एकूण ७५ वर्षांचा कालखंड अडीच तासात मांडण्यात संपुर्ण टीम यशस्वी ठरली आहे. ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असाच आहे. जम्मू-काश्मिरचा इतिहास जाणून घेण्यासाठी मनोरंजक पद्धतीने पण वास्तवाशी जोडून ठेवणारा हा चित्रपटाचा आस्वाद एकदा तरी नक्की घेता येण्यासारखा आहे.