बाळासाहेबांचा पहिला शिवसैनिक अशी ज्यांची ओळख होती, ते म्हणजे मनोहर जोशी. शिवसेना पक्ष कायम आपल्या आक्रमक राजकारणासाठी ओळखला जायचा पण अशा आक्रमक पक्षाला मनोहर जोशींनी कधी-कधी शांततेत सुद्धा क्रांती होऊ शकते, हे शिकवलं होतं. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे २३ फ्रेब्रुवारीला पहाटे निधन झाले. मनोहर जोशी ८६ वर्षांचे होते. आपल्या राजकिय कारकिर्दीमध्ये त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान मिळविला होता.
वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाऊ शकत नाही. मनोहर जोशींच मुळचे रायगड जिल्ह्यातील नांदवी गावचे पण त्यांचे शिक्षण मात्र मुंबईत झाले. वकीलीचे शिक्षण पूर्ण करुन बीएमसीमध्ये अधिकारी झालेल्या मनोहर जोशींनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच बाळासाहेबांची साथ दिली. बाळासाहेबांचा निष्टावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख त्याच काळात निर्माण झाली.
१९६७ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर मनोहर जोशींना १९६८ मध्ये लोकप्रतिनिधी बनण्याची संधी मिळाली. १९६८ मध्ये नगरसेवक झालेले मनोहर जोशी १९७० मध्ये स्थायी समितीचे अध्यश बनले. त्यानंतर लगेच १९७२ ला मनोहर जोशींची निवड विधान परिषदेवर करण्यात आली. अशाप्रकारे मनोहर जोशी राजकारणात प्रवेश केल्यापासून अवघ्या ५ वर्षात आमदार झाले. १९७२ पासून मनोहर जोशी सलग तीन टर्म शिवसेनेकडून आमदार राहिले. १९९० ला मात्र मनोहर जोशींनी विधानभा निवडणूक लढवली.
मार्च 1995 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशींना मुख्यमंत्री पद मिळालं. अशाप्रकारे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनण्याचा मान मनोहर जोशींना मिळाला. दोनदा नगरसेवक, तीनदा विधानपरिषद सदस्य, 1976-77 मध्ये मुंबईचे महापौर, दोनदा विधानसभा सदस्य, 1990-91 मध्ये विरोधी पक्षनेते पद अशी पदं त्यांनी सांभाळली. जोशी सरांनी राजकारणासोबतच उद्योग व्यवसायामध्ये चांगला जम बसविला होता. त्यांच्या कोहिनूर उद्योग समुहाचे नाव आजही प्रसिध्द आहे. मराठी मुलांना व्यावसायिक कौशल्य शिकविण्याचे त्यांचे वर्ग प्रसिध्द होते.
कोहिनूर ग्रुप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहे. कोहीनुरच्या ७० शाखांमधुन आज १२००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १९९५ ते १९९९ ला मुख्यमंत्री राहिल्यानंतर मनोहर जोशी दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले होते. त्यावेळी केंद्रात एनडीएचे सरकार होते. खासदार होताच मनोहर जोशींना अटलबिहारी वाजपेयीच्या सरकारच्या मंत्रीमंडळात सहभागी करण्यात आलं. 1999-2002 दरम्यान अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री म्हणुन त्यांनी काम पाहील. त्यानंतर २००२ ते २००४ मध्ये मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्षही झाले.
ही झाली मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द. मनोहर जोशींच्या राजकीय कारकीर्दीकडे पाहिल्यास आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. ती म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला आलेले मोठे पद कायम मनोहर जोशींना मिळालं. त्याला कारण होते बाळासाहेब ठाकरें. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तरी कधीही बाळासाहेबांच्या शब्दांच्या बाहेर गेले नाहीत. मनोहर जोशींवर एकदा स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मनोहर जोशी जगातले एकमेव मुख्यमंत्री असतील ज्यांच्यावर त्यांच्याच पक्ष प्रमुखाने भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.
मनोहर जोशींना बाळासाहेबांच्या हातातला रिमोट असही म्हणल जायच पण मनोहर जोशींनंतर मुख्यमंत्री झालेले नारायण राणे म्हणतात. की त्यांच्यावर रिमोट कंट्रोल अशी टिका व्हायची पण रिमोट कंट्रोलच बटन दाबल गेल्यानंतरही त्यांचे निर्णय स्वत:चे होते. पण मनोहर जोशींनी बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा कधीच कमी होऊ दिली नाही. डॉ. मनोहर जोशी यांच्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये इतर लेखकांनी 17 पुस्तके लिहिली आहेत. ऑडिओ बुक्स 10 आहेत. वयाच्या 72 व्या वर्षी 'शिवसेनेची निर्मिती आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली आहे.
मनोहर जोशींनी आपले संपुर्ण आयुष्य शिवसेना पक्षाला दिले. त्यांनी प्रबोधनकार ठाकरें, बाळासाहेब ठाकरे, उद्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठाकरे घराण्याच्या चारही पिढ्यांसोबत काम केले आहे. बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक प्रथितयश उद्याेजक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष असा प्रेरणादाई प्रवास करणाऱ्या राजकारणातील एका मनोहर पर्वांचा आज अंत झाला. मनोहर जोशींना भावपुर्ण श्रद्धांजली.