सर्व कम्युनिस्ट देशांनी आपली दुष्कृत्ये झाकण्यासाठी अपप्रचार तंत्राचा अगदी खुबीने वापर केला. दुर्दैवाची गोष्ट अशी की, अनेक लोकशाहीवादी देशांमधील लोकांनीच कम्युनिस्ट सरकारांचे सत्य ठाऊक असतानाही त्यांच्या अमानुष अत्याचारांवर पांघरूण घालून या पाशवी राजवटीचे समर्थन केलेले दिसते. आता सोशल मीडियाच्या माध्यमांतून हे चिनी हस्तक आपला प्रचार करीत असले, तरी आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात असा खोटा प्रचार फार काळ टिकत नाही.
इस्रायलनंतर कदाचित भारत हाच एकमेव देश असेल, जो चारही बाजूंनी शत्रूराष्ट्रांनी वेढला गेला. पण, इस्रायलही एका बाबतीत सुदैवी आहे आणि ती गोष्ट म्हणजे, त्या देशात घरभेदी नाहीत. पण, भारताला घरभेदीपणाचा शाप प्राचीन काळापासून लागला आहे, तो आजतागायत. आता चिनी सरकारकडून पैसे घेऊन समाजमाध्यमांमध्ये तसेच अन्य प्रसार माध्यमांमध्ये भारताबाबत खोटा आणि विषारी प्रचार करणारे काही लोक असून, त्यांच्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका उत्पन्न झाला आहे, असा गुप्त अहवाल सुरक्षा संस्थांनी केंद्र सरकारला दिला. यासंबंधी एक लेख ‘इंडिया टुडे’ मासिकाने प्रसिद्ध केला. या सुरक्षा संस्थांनी काही संशयास्पद व्यक्तींवर आणि त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून भारतविरोधी प्रचाराचे षड्यंत्र कसे सुरू आहे, ते केंद्र सरकारला सांगितले आहे. या व्यक्तींनी चिनी सरकारकडून आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून पैशाच्या मोबदल्यात भारतविरोधी प्रचार आणि खोट्या बातम्या पसरविण्याची मोहीम हाती घेतली असून, चीनच्या भूमिकेच्या बाजूने जनमत वळविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे या सुरक्षा संस्थांनी केंद्र सरकारला कळविले आहे.
या बातमीत आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सध्या सुरू असलेल्या तथाकथित शेतकर्यांच्या आंदोलनात अशा घरभेद्यांचे दर्शन देशाला घडतेच आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अशाच प्रकारच्या शेतकरी आंदोलनातील अनेक घटनांनीही भारतविरोधी प्रचारात परदेशी ‘टूलकिट’ कसे वापरले गेले होते, ते जगाला दिसून आले. अगदी कोरोनासारख्या महामारीत लोकांच्या जीवाशी खेळण्यापर्यंत या घरभेद्यांची मजल गेली. कसेही करून मोदी सरकारला बदनाम करायचे आणि त्याच्याविरोधात वातावरणनिर्मिती करायची, त्यासाठी निरपराध भारतीयांचे बळी गेले, तरी चालतील याच एकमेव उद्देशाने ही कम्युनिस्ट पिलावळ वळवळ करीत आहे (‘व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात त्याचे प्रत्ययकारी दर्शन घडविले आहे). गेल्यावर्षी केंद्र सरकारने ‘न्यूजक्लिक’, ‘आल्ट न्यूज’ वगैरे काही ऑनलाईन वृत्त संकेतस्थळांवर केलेली कारवाई तसेच अनेक चिनी अॅप्सवर घातलेल्या बंदीमुळे अशा भारतविरोधी घरभेद्यांना मोठा फटका बसला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत चीनने भारताचा शेकडो किलोमीटरचा प्रदेश व्यापला आहे, असा दुष्प्रचार काँग्रेसचे नेते राहुल गांधी सतत करीत असतात. त्यात तथ्य नाही, हे आजवर अनेकदा दिसून आले असले, तरी असत्य वारंवार सांगितले गेले, तर ते सत्य आहे, असे वाटू लागते. हा मानवी स्वभावाचा भाग आहे. हिटलरचा प्रचारप्रमुख गोबेल्सने या तंत्राचा प्रभावी वापर केल्याने त्यास ‘गोबेल्सनीती’ म्हणून ओळखले गेले. पण, सर्व कम्युनिस्ट राजवटी कायमच अशा प्रकारे खोट्या प्रचाराचा वापर करीत आल्या आहेत. अगदी अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या कट्टर लोकशाहीवादी देशांमध्ये शीतयुद्धाच्या काळात तत्कालीन सोव्हिएत रशियाचे अनेक हस्तक अशा प्रकारे तेथील कम्युनिस्ट राजवटीची भलामण करीत असत. या हस्तकांनी विद्यापीठांसारख्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आपला प्रभाव वाढविला असून, आजच्या काळातही अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांतील विद्यापीठांमध्ये याच डाव्या विचारसरणीच्या प्राध्यापकांचा वरचश्मा आहे. आज ते भलेही कम्युनिस्ट विचारसरणीचा थेट प्रचार करीत नसले, तरी डावी विचारसरणी आणि सर्वंकष हुकूमशाहीचा अप्रत्यक्ष प्रचार त्यांच्याकडून केला जातो. लोकशाही ही सामान्य माणसाला न्याय देण्यात कशी अयशस्वी ठरली, हेही त्यांच्याकडून ठसविले जाते. जगातील सर्व कम्युनिस्ट राजवटींचे हे हस्तक बुद्धिजीवी लोकांच्या वेषात समाजात वावरत राहिले. आजही अमेरिका असो की ब्रिटन की भारत, तेथील शैक्षणिक संस्तांवर या डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या लोकांचा पगडा आहे.
भारतासारख्या देशात नक्षलवादी आणि माओवादी हिंसाचाराचे समर्थन करणारे हेच कम्युनिस्ट हस्तक असतात. त्यांना आजच्या काळात ‘अर्बन नक्षली’ म्हणून ओळखले जाते. भारताचे सामर्थ्य एकतेत असल्याचे त्यांना ठाऊक असल्याने भारताची आणखी शकले कशी उडतील, यासाठी हे अर्बन नक्षली प्रयत्नशील असतात. भारतातील ‘तुकडे तुकडे गँग’ हे त्याचे ठळक उदाहरण. त्याला आता भाषा, धर्म, प्रांत यावरून भारतीय समाजात दुही माजविणार्या अर्बन नक्षली राजकीय नेत्यांची साथ मिळाली आहे. सनातन धर्म, भारतीयांची आराध्य दैवते, भाषा यासारख्या मुद्द्यांवरून गेल्या काही महिन्यांमध्ये निर्माण केलेले वाद हे त्याचेच द्योतक आहेत.
सरहद्दीवर समोरासमोर उभ्या ठाकलेल्या शत्रूचा पराभव करणे सोपे आहे, पण पाठीमागून वार करणार्या अदृष्य शत्रूशी लढणे खूपच अवघड. भारताशी प्रत्यक्ष युद्धात दोन हात करण्याची क्षमता आणि हिंमत ना पाकिस्तानमध्ये आहे, ना चीनमध्ये. दोन्ही देश ही गोष्ट ओळखून आहेत. गेली दोन वर्षे लडाख आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच अरुणाचल प्रदेशात भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे लाखभर सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चार वर्षांपूर्वी गलवान खोर्यात भारतीय सेनेकडून बेदम मार खाल्ल्यानंतर प्रत्यक्ष युद्ध करायचे नाही, पण युद्धाचा आव आणायचा आणि सीमेवर तणाव कायम ठेवायचा, हे नवे तंत्र चीनने अवलंबिले. पण, भारतीय सैन्यानेही या मनोवैज्ञानिक युद्धाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. अमेरिकी वरिष्ठ नौदल अधिकार्यांबरोबर नुकत्याच झालेल्या एका परिषदेत भारताचे संरक्षण सचिव गिरिधर अरामाने यांनी भारत-चीन सरहद्दीवर चीनच्या दबावाला न जुमानता भारतीय सैन्य कसे ठामपणे उभे आहे आणि चीनचा मनसुबे कसे उधळून लावीत आहे, त्याची माहिती दिली. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेकडून वेळच्या वेळी मिळणार्या चीनच्या गुप्त लष्करी हालचालींच्या माहितीचा भारताला मोठा लाभ झाल्याचेही अरामाने यांनी सांगितले. भारतीय लष्कर त्याचे काम चोखपणे पार पाडीत असले, तरी आता नागरिकांनीही सजग राहून हा चिनी दुष्प्रचार हाणून पाडला पाहिजे.