मराठा आरक्षण दिलं पण, राज ठाकरे म्हणतात, "तोंडाला पानं पुसली!"
20-Feb-2024
Total Views | 118
मुंबई : मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर आक्षेप घेत मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरु असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मराठा समाजाला जागृत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मराठा समाजाने जागृत राहावं. त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरु आहे. मुळात राज्य सरकारला या गोष्टींचे अधिकार आहेत का? ही गोष्ट केंद्राची आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आहे. हा विषय खूप टेक्निकल आहे. सरकारने जाहीर केल्यामुळे नुसता आनंद मानण्यासारखं नाही. हे नक्की काय आहे हे मराठा समाजाने त्यांना विचारावं. १० टक्के दिलं म्हणजे तुम्ही नक्की काय केलं? कशात १० टक्के दिलं? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का? की, हे प्रकरण परत सुप्रीम कोर्टात जाणार आणि राज्य सरकार सांगणार की, आता आम्ही काही करु शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी करण्याला काहीही अर्थ नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "आज या देशात अनेक राज्य आहेत आणि राज्याराज्यात अनेक जाती आहेत. त्यांचेही काही विषय आहेत. हे असं एका राज्यात एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत. समाजाने या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत. पण याकडे कुणाचंच लक्ष नाही. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर या राज्यात किंवा देशात काहीही सुरु नाही," असेही ते म्हणाले.