(Manmohan Vaidya on Dharma)
मालवा : "धर्माला रिलीजन म्हणणे योग्य नाही. रिलीजन ही उपासनेची पद्धत आहे. त्यामुळे धर्माला इंग्रजीतही धर्मच म्हटले पाहिजे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, मालवा येथील 'नर्मदा साहित्य मंथन' या वार्षिक साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अहिल्यादेवी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रेणू जैन यादेखील उपस्थित होत्या.
डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले की, "अध्यात्म हा आपल्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार आहे. 'राष्ट्रीय' या शब्दाचा अर्थ राष्ट्र समजून घेणे आणि राष्ट्राबद्दल विचार करणे असा आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे कोविड आपत्तीच्या काळात सरकारी यंत्रणेने खूप चांगले काम केले. पण, त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे लाखो लोक, आपल्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही, इतर लोकांच्या मदतीसाठी आणि सेवा करण्यासाठी रस्त्यावर उतरले. जगाने सांगितले की भारत हा कृषीप्रधान देश होता, पण वास्तविकतः प्राचीन काळात भारत हा औद्योगिक देश होता."