टोलनाके इतिहासजमा होणार! काय आहे गडकरींचा मास्टरप्लॅन

    18-Feb-2024
Total Views |

Gadkari


भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी. काही लोकं त्यांना रोडकरी आणि फ्लायओव्हर गडकरी या टोपण नावानेसुद्धा ओळखतात. त्यांच्याच नेतृत्वात आज देशाच्या रस्ते वाहतुकीत आमूलाग्र बदल होत आहेत. नितीन गडकरी देशभरात नुसतं रस्त्यांचं जाळंच पसरवत नाहीत तर, वाहतूक प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी रस्ते कशाप्रकारे सुलभ होईल, याबाबत विविध प्रयोग करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. अशाच एका प्रयोगाची घोषणा नितीन गडकरींनी केलीये. तो प्रयोग आहे. जीपीएस आधारित टोलवसुली यंत्रणा. यामुळे भारतातील महामार्गांवरील टोलनाके इतिहासजमा होतील. कोणत्याही थांब्याविना महामार्गांवरुन वाहने सुसाट धावतील. 
 
या गोष्टीला खूप काळ झालेला नाही. तीन वर्षांपूर्वी देशातील महामार्गांवरील टोलनाक्यांवर लांबच-लांब रांगा लागलेल्या असायच्या. प्रत्येक गाडी टोलनाक्याजवळ थांबायची. कॅशमध्ये पेमेंट व्हायचं आणि पावती घेऊन गाडी पुढे जाईची. या प्रक्रियेत बराच वेळ जात असत. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२१ मध्ये फॉस्टॅग येण्याच्या आधी टोलनाक्यांवर वाहनांना सरासरी आठ मिनिटं थांबावं लागत. पण, फॉस्टॅग आल्यानंतर ही वेळ अवघे ४७ सेकंद इतकीच बाकी आहेत. तरीही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही वेळ आणखी कमी करायची आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित टोल वसुली यंत्रणा आणली जात आहे. ती टोल वसुली यंत्रणा आहे. जीपीएस आधारित टोलवसुली यंत्रणा.
 
काही दिवसांत तुम्हाला टोल नाक्यावर फास्टॅगची गरज भासणार नाही. नवीन यंत्रणेची माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले होते की, "जीपीएस आधारित टोलवसुली यंत्रणा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. जीपीएस आधारित नवीन टोलवसुली यंत्रणा मार्चपासून लागू केली जाऊ शकते." जीपीएस आधारित टोल कलेक्शन सिस्टम तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करेल आणि त्याआधारे टोलचे शुल्क रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्यांच्या खात्यातून कापले जाईल. ही यंत्रणा लागू झाल्यानंतर गाड्यांना कुठेही थांबण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे टोलनाक्यावरील वाहतूककोंडी संपुष्टात येईल. या यंत्रणेचा आणखी एक फायदा म्हणजे गाड्यांनी जेवढा प्रवास केला आहे. तितकेच शुल्क आकारले जाईल. यामुळे अतिरिक्त शुल्काचा भुर्दड रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पडणार नाही.
 
फॉस्टॅग यंत्रणेमध्ये गाडीने महामार्गावर किती प्रवास केला यावर शुल्क ठरत नाही. तर, गाडीच्या प्रकारावर एक विशिष्ट शुल्क आकारले जाते. मात्र, जीपीएस आधारित टोल वसूली यंत्रणेमध्ये गाडीने जितका प्रवास केला तितकेच शुल्क आकारले जाईल. त्यामुळे ही यंत्रणा महामार्गांनी प्रवास करणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सध्या देशातील दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर या यंत्रणेचा वापर केला जात आहे. लकरच ही यंत्रणा फॉस्टॅगची जागा घेईल. 
 
                                                                                                                         - श्रेयश खरात