नवी दिल्ली : आंदोलक शेतकरी संघटनांसोबत झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झाली आहे. यापुढील चर्चा रविवारी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित राहिले आहे. केंद्र गुरुवारी सरकारने शेतकरी संघटनांना चर्चेसाठी बोलावले होते. अनेक शेतकरी नेते आले आणि अतिशय अर्थपूर्ण चर्चाही झाली. येत्या रविवारी पुढील बैठक ठरवली आहे. रविवारीही चर्चा चांगल्या वातावरणात होईल असा विश्वास असून आम्ही प्रश्न सोडवण्याच्या दिशेने वाटचाल करू, असे केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले.
खते, सिंचन, एमएसपीवर खरेदी, बँकांकडून स्वस्त कर्ज आणि नुकसानभरपाई यावर मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात जेवढे काम केले आहे तेवढे आजच्या आधीच्या कोणत्याही सरकारने केले नाही, असे केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 2013-14 मध्ये युपीए सरकार सत्तेत असताना कृषी अर्थसंकल्प 27 हजार 662 कोटी रुपये होता.
सध्या मोदी सरकारचा कृषी अर्थसंकल्प 1 लाख 25 हजार कोटींहून अधिक आहे. म्हणजे कृषी अर्थसंकल्प संपुआच्या काळापेक्षा ५ पट जास्त आहे. काँग्रेसच्या काळात किसान सन्मान निधी नव्हता, मोदी सरकारने किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2 लाख 81 हजार कोटी रुपये दिले आहेत, अशीही माहिती केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी दिली.