(Bharatiya Kisan Sangh on Delhi Farmer Protest)
नवी दिल्ली : 'राजकीय हेतू असलेले काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याचा वापर करतात तेव्हा वाईट वाटते. शेतकऱ्यांच्या नावाने राजकीय आंदोलन केले जाते तेव्हा शेतकऱ्यांचेच नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय निवडणुकीतील डावपेच बंद झाले पाहिजेत.', असे म्हणत भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्र यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाला विरोध दर्शविला आहे.
त्यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, 'भारतीय किसान संघ शेतकऱ्यांच्या मालाला त्यांच्या किंमतीच्या आधारे योग्य भाव मिळावा या मागणीसाठी सातत्याने लढा देत आहे. केंद्र सरकारशी संवाद साधून ते शेतकऱ्यांचे खंबीरपणे प्रतिनिधित्व करत आहेत. जिथे संवादातून मार्ग सापडत नाही तिथे आंदोलनेही होतात. १९ डिसेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर किसान गर्जना रॅलीच्या रूपात एक लाख शेतकऱ्यांची शिस्तबद्ध शांततापूर्ण निदर्शने हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.'
'राजकीय हेतूने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलने होतात, तेव्हा आंदोलनादरम्यान होणारा हिंसाचार, अराजक वातावरण आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान यामुळे समाजात शेतकऱ्यांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात. त्याचा तोटा आपल्या भल्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याला सहन करावा लागतो. ज्यांना आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या आहेत त्यांनी तसे करावे, मात्र भारतीय किसान संघ हिंसक आंदोलनाला पाठिंबा देत नाही.'
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते सामंजस्याने तोडगा काढत आहेत. किमतीवर आधारित योग्य भाव हा शेतकऱ्याचा हक्क आहे, तो त्याला मिळालाच पाहिजे.