धर्म, संस्कृती, आशा, आकांक्षांना तंत्रज्ञानाची जोड देणारा आजचा भारत. त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाकडून पुढील वर्षी आयोजित करण्यात येणारा ‘डिजिटल कुंभमेळा’ हा ‘ब्रॅण्डिंग’ क्षेत्रातील एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. महाकुंभ मेळावा जगभर पोहोचवण्याबरोबरच, स्वच्छतेचे महत्त्व व सांस्कृतिक परिवर्तनातून उत्तर प्रदेशच्या कायापालटाचे शिवधनुष्य योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतले आहे. सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे पाहता, संस्कृतीकडून तंत्रज्ञानाकडे जाणारा हा तेजोमय प्रवास आणि त्यातील योगींच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचे कल्पक योगदान अधोरेखित करणारा हा लेख...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विकासाचा ’योगीपुरुष’ म्हणून संबोधले जाते. कारण, अध्यात्मिक शिक्षण व विकासाची धोरणे यांचा अभ्यास ‘व्हिजन’ सेट करण्यात योगींना निश्चितच कामी आला. अध्यात्मातून समाजभान साधण्याचे कसब योगींनी गेल्या काही वर्षांत लीलया पार पाडलेले दिसते. विज्ञान- तंत्रज्ञानाची विशेष आवड असणारे योगी आदित्यनाथ देशविदेशातील प्रत्येक घडामोडीवर अगदी बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यामुळे केवळ उत्तर प्रदेशातच नाही, तर देशविदेशात विकासाची गंगा कशी प्रवाहित होत आहे, याकडेही त्यांचा कटाक्ष असतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्ष्यानुसार, २०४७ पर्यंत ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करायचे असेल, तर भारत हा ‘ग्लोबल ब्रॅ्रण्ड’ म्हणून विकसित झाला पाहिजे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ. १७व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणातदेखील पंतप्रधान मोदींनी ‘शोध ही मानवीय गरज आहे,’ असे या अनुषंगाने निक्षून सांगितले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत योगीही मार्गक्रमण करताना दिसतात. म्हणूनच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा योगी आदित्यनाथ यांनी सांभाळल्यापासून या राज्याचा सर्वांगीण कायापालट झालेला दिसतो.
उत्तर प्रदेश सरकार व योगी आदित्यनाथ यांनी ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’ची जोरदार तयारी सुरु केली आहे. २०२५ मधल्या महाकुंभ मेळाव्यासाठी सरकारी, गैरसरकारी संस्थांनी एकत्र येऊन महाकुंभ मेळाव्याला ’ग्लोबल’ ब्रॅण्ड बनवण्याचा चंगच बांधला आहे. याच देवभूमीतून आध्यात्मिक पर्यटनाकडे विस्तार करण्यासाठी ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, या कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी पूर्व प्रयागराज येथील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्र यांची ब्रॅण्डिंग उत्तर प्रदेश सरकार व खासगी कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येईल. सर्वप्रथम स्थानिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल ब्रॅण्डिंग इन्फ्लुएन्सर्स’ सोबतच हे कॉन्क्लेव्ह संपन्न होईल.मार्चमध्ये दोनदिवसीय कॉन्क्लेव्ह समारोह मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असून, तसा अधिकृत प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी शासनाला सादर केला गेला होता. यानिमित्ताने हॉटेल व्यवसायिकांना निमंत्रित करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले गेले.
प्रयागराज महापालिकेचे आयुक्त चंद्र मोहन गर्ग यांनी सोशल मीडियाकर्मींची बैठक आयोजित करत, प्रयागराज स्वच्छता मोहिमेसाठी माध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार असल्याचे सांगितले. ‘कुंभमेळा २०२५’ हा ४५ दिवसांचा महाकुंभमेळा असून, सात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यादरम्यान होणार आहेत. दि. १४ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत हा मेळावा असेल. यामध्ये शाही स्नान, मौनी अमावस्या, वसंत पंचमी, पौष पौर्णिमा, माघी पौर्णिमा, महाशिवरात्री हे कार्यक्रम संपन्न होतील. सांस्कृतिक तरलता स्वच्छतेशिवाय शक्य नाही. निश्चितच याला प्रयागराज महापालिकेचे पाठबळ असल्याने स्वच्छतेच्या अडचणी दूर होतील, यात दुमत नसावे.उत्तर प्रदेश राज्य पायाभूत सुविधांबाबत सक्षम झालेच, त्याचबरोबर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातही योगी सरकारच्या काळात अभूतपूर्व प्रगती नोंदवली गेली. आकडेवारीवर नजर टाकली असता, ‘पार्क रिसर्च सेंटर’च्या डाटानुसार, २०१९च्या कुंभमेळ्यातील पर्यटनामुळे ७११ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. आगामी काळातील कुंभमेळ्याचा विचार करता २०१९च्या कुंभमेळ्याचा परामर्श घेणेही तितकेच आवश्यक ठरते.
उत्तर प्रदेश सरकारतर्फे प्रयागराज कुंभमेळा अधिकार समिती नेमण्यात येते. या समितीद्वारे २०१९च्या कुंभमेळा ’मिशन स्वच्छता’ अंतर्गत २० हजार स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी २० हजार स्वच्छतागृहे बांधली गेली होती. ४० हजार ७०० घरांमध्ये पर्यावरणपूरक एलईडी लाईटची व्यवस्था यंत्रणेकडून केली गेली. ‘मिशन स्वच्छते’अंतर्गत कुंभमेळ्यात ’गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ’देखील प्रस्थापित करण्यात आला. उदाहरणार्थ प्रत्येक दोन मिनिटांसाठी टाकाऊ पदार्थ उचलण्यासाठी व्हॅन तैनात करण्यात आली होती.‘सरकारी काम, सहा महिने थांब’ या पंक्ती खोडत आता भारत सरकार बदलत्या काळाचा विचार करत आहे. याचे नेमके उदाहरण म्हणजे, ’सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह.’ यावेळी सरकारने जाहिरात कंपन्या, डिजिटल मार्केटिंग, पीआर कंपन्या यांचा प्रभावीपणे वापर करत, जगभर पोहोचवण्यासाठी कृती आराखडा तयार केलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाकडून यांची अंमलबजावणी सुरू झाली. या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हमध्ये साहित्य, पर्यटन, अध्यात्म, संस्कृती, वारसा, ग्लोबल ब्रॅण्डिंग, मार्केटिंग अशा विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बदलत्या काळानुसार विविध संस्कृतीची देवाणघेवाण ही फक्त धर्मातच नाही. पण, राष्ट्राच्या सांगोपांग विचार करण्यासाठी मूलभूत स्रोत ठरते. सरकारी जोड असल्यावर यांचा वापर समाजासाठी कसा करता येईल, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे.
उत्तर प्रदेशात औद्योगिकरणाकडे विशेष लक्ष, सेवा जाहिरात क्षेत्रातील वाढत असलेल्या नोकरीच्या संधी, राम मंदिरांमुळे सांस्कृतिक परिवर्तनातून घडणारे पर्यटन, अशा बहुढंगी कामकाजातून उत्तर प्रदेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो आहे. ९०च्या दशकात कुंभमेळा हा फक्त नदीचे प्रदूषण करतो, असा काही नतद्रष्ट मंडळींकडून अपप्रचार केला गेला. पण, योगींनी मात्र कुंभमेळ्यात स्वच्छतेबरोबरच सगळ्या कार्यक्रमांचे आयोजन हे कसे असावे, याची चाचपणी केली आहे.प्रयागराजमध्ये मोदी सरकारने विशेष लक्ष घातले. परिणामी, हिंदूंचे हे तीर्थक्षेत्र अधिक विकसित होत आहे. खरं तर चांगल्या कला, सणांना जाहिरात, ब्रॅण्डच्या जोरावर समाजात वैचारिक अधिष्ठान मिळते. परिणामी, समाजमनात ब्रॅण्डची आगळीवेगळी निर्माण होणारी ओळख ग्राहकांसाठी ‘रिकॉल व्हॅल्यू’ वाढवणे. सणदेखील त्याला अपवाद नाहीत. सणांची उद्दिष्टे जनसामान्यांना पोहोचवण्यासाठी जाहिरात मोहीम मदत करते. आजही अनेक जाहिरात ब्रॅण्ड धार्मिक विधी व वस्तूंचे प्रतिनिधित्व करणारे ब्रॅण्ड आहेत. यातूनच ब्रॅण्ड आणि मार्केटिंग यांचे धर्माशी असणारे कनेक्शन स्पष्ट होते.
आज सोशल मीडियाचा प्रभावी वापर ’गेमचेंजर’ ठरला आहे. मोठ्या व्यावसायिक कंपन्यांपासून ते स्टार्टअप्सपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी करतात. त्यात आता सरकारचीही भर पडली आहे. लोकाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाच्या शस्त्राचा वापर राजकीय पक्षांकडून केला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत आता विविध कारणांसाठी याचा वापर होतो. याच धर्तीवर ’स्वच्छ सर्वेक्षण’ व कुंभमेळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.कुंभमेळा हे केवळ शक्तीचे प्रतीक नसून संवर्धनाचे प्रतीक आहे. या स्वच्छतेच्या जाहिरातीतून सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर्सदेखील यात सहभाग नोंदवणार आहेत. योगी आदित्यनाथ यांचा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास याला कवचकुंडले देण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. योगी आदित्यनाथ यांच्या कुशल प्रशासक या ओळखीने उद्योग व ‘व्हेंचर कॅपिटललिस्ट’ व्यक्तींकरिता उत्तर प्रदेश हे गुंतणुकीसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे.
व्यवस्थापनासाठी थेट निर्णय घेणारे योगी व ब्रॅण्ड बिझनेस मॉडेल पाहता हे धोरण किती प्रगती करेल, हे येणारा काळच ठरवेल. पण, संकेतस्थळावरील माहिती उपलब्ध होण्यापासून तत्वज्ञान जाणून घेईपर्यंत या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत मिळत आहे. तत्पूर्वी धार्मिक विधीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला नसला तरी ‘योगी इंटेलिजन्स’चा मात्र निश्चित वापर चालू झाला आहे. योगींची वाटचाल पाहता, उत्तर प्रदेश डिजिटायझेशनकडे झुकत असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुढील वर्षी होऊ घातलेले हे ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’ असे म्हणता येईल.या माध्यमातून डिजिटल मीडियाच नाही, तर अनेक उद्योग-कंपन्या ‘सीएसआर’ अर्थात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या माध्यमातून अनेक प्रायोगिक व खासगी तत्वावर समाजकल्याणात साथ देऊ शकतात. हे योगी सरकारचे इप्सित आहे. राष्ट्रीय संस्कृती कलात्मकतेला समाजभानाचा पाठिंबा मिळाल्यास देशाच्या आर्थिक प्रगतीत सुधारणा होऊन उपयुक्ततेचा साज चढवला जाईल. विशेषतः भविष्यात अशाच योगी आदित्यनाथ यांच्या विकासपुरुषाची गरज असून, आपण यत्किंचितही काळाच्या मागे वळून पाहणे अपेक्षित नाही. तेव्हा, एकूणच काय ‘खासगी-सरकारी भागीदारी’ हाच भारतासारख्या मिश्र अर्थव्यवस्थेसमोरील पर्याय आहे, हेच खरे!
- मोहित सोमण