विकसित भारताच्या ध्येयात राजस्थानचे स्थान महत्त्वाचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
रायझिंग राजस्थान शिखर परिषदेचे केले उद्घाटन
09-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : राजस्थान हे केवळ उदयोन्मुख राज्य नव्हे तर ते विश्वासार्हही आहे. तसेच परिवर्तनाचा स्वीकार करणारे आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल करणारे असे हे राज्य आहे. त्यामुळे विकसित भारताच्या ध्येयात राजस्थानचे स्थान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी सोमवारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये जयपूर येथे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट २०२४ या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्स्पो या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले, आह्वानांना तोंड देण्याचे आणि संधी निर्माण करण्याचे दुसरे नाव राजस्थान हे आहे. अगदी कमी कालावधीत राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठी कामगिरी केली आहे. गरिब आणि शेतकऱ्यांचे कल्याण, तरुणांसाठी नवीन संधींची निर्मिती, रस्ते- वीज- जलप्रकल्प अशा विकासकामांची उभारणी इत्यादी क्षेत्रात राजस्थानचा वेगवान विकास होत आहे. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सरकारने दक्षपणे उपाययोजना केल्यामुळे, नागरिकांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये नवा उत्साह संचारला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
जस्त, शिसे, तांबे, संगमरवर, चुनखडी, ग्रॅनाईट, पोटॅश असे खनिजांचे बहुतांश साठे राजस्थानात असल्याचे नमूद करून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा हा भक्कम पाया ठरेल आणि भारताच्या ऊर्जासुरक्षेत राजस्थानचे योगदान मोठे असेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, या दशकाच्या अखेरपर्यंत ५०० गिगावॅट नवीकरणक्षम ऊर्जेच्या क्षमतेची उभारणी करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. यातही राजस्थानची भूमिका महत्त्वाची आहे, कारण भारतातील अनेक मोठी सोलर पार्क येथे उभारली जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
मोठमोठ्या दळणवळण प्रकल्पांच्या केंद्रस्थानी राजस्थान असल्यामुळे ते गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र ठरत आहे. तेथे ड्रायपोर्ट आणि वाहतूक क्षेत्र यशस्वी होण्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. सरकार मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क्स म्हणजे दळणवळणाचे विविध पर्याय उपलब्ध असणारी केंद्रे विकसित करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जवळपास २४ क्षेत्रविशिष्ट (सेक्टर स्पेसिफिक) इंडस्ट्रिअल पार्क्स आणि २ एअर कार्गो कॉम्प्लेक्स यांची निर्मिती सुरू आहे. यामुळे उद्योग एकमेकांशी जोडण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होईल आणि राजस्थानात उद्योग उभारणे सोपे होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.