समाजवादी पक्षाची वेगळी चूल; काठावरचे आमदारही भूमिका घेण्याच्या तयारीत
08-Dec-2024
Total Views | 51
1
मुंबई : ‘उधारीची पोते, सव्वा हात रिते’ असे म्हणतात, महाविकास आघाडीत सध्या तशीच स्थिती आहे. सत्तेच्या हव्यासापोटी विचारधारा त्यागून एकत्र आलेल्या या आघाडीत मोठी फूट पडली आहे. उबाठाच्या ( UBT ) सेक्युलर हिंदुत्वाला कंटाळून मविआत न राहण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला आहे. विधानसभेत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत राहून भविष्यात हाती धुपाटणेच मिळणार, हे ध्यानात आल्यामुळे त्या त्या पक्षातील काठावरचे आमदारही अस्वस्थ असून ते लवकरच वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे कळते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर शनिवार, दि. 7 डिसेंबर रोजीपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. त्यात आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्याची प्रक्रिया सुरू असताना, महाविकास आघाडीने त्यावर बहिष्कार घातला. मात्र, समाजवादी पार्टीने मविआपासून फारकत घेत, शपथविधीला उपस्थिती दर्शवली. त्यांचे दोन्ही आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर विधिमंडळाबाहेर येऊन मविआतून बाहेर पडण्याची घोषणा केली.
आम्हाला त्यांच्याशी घेणे-देणे काय?
समाजवादी पार्टीचे अबू आझमी म्हणाले, “त्यांनी (मविआ) आमच्याशी निवडणुकीदरम्यान संपर्क साधला नाही. तिकीटवाटपात आमच्याशी बोलणी केली नाहीत. मग आम्हाला त्यांच्याशी घेणे-देणे काय? उद्धव ठाकरे तर म्हणत होते की, मी धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) झालो आहे. हेच सांगून त्यांनी समाजवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी केली. आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना हिंदुत्वाच्या गोष्टी आठवल्या का? उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. दि. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडणार्यांचे अभिनंदन केले जाते. अशा पक्षाबरोबर समाजवादी पार्टी राहू शकत नाही,” अशी घोषणा आझमी यांनी केली.
आम्ही त्यांच्याशी चर्चा करू!
“उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गेल्या २० वर्षांची ही विचारधारा आहे. त्यात काही नवे नाही. अबू आझमी यांनाही ते माहीत आहे. महायुतीमधील काही घटक महाविकास आघाडीची ताकद कमी करू पाहात आहेत. पण, आमच्यावर त्याचा कोणताच परिणाम होणार नाही. आम्ही याबाबत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करू. समाजवादी पार्टी महाविकास आघाडी किंवा ‘इंडी’ आघाडीची साथ सोडेल, असे वाटत नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू,” असे काँगे्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
विरोधी आमदारांना शपथ घ्यावीच लागेल : अजित पवार
“शपथ घेण्यासाठी रविवार, दि. ८ डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विरोधी आमदारांना संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावी लागेल, तरच परवा सभागृहामध्ये ते कामकाजात भाग घेऊ शकतात. आपण काहीतरी वेगळे करीत आहोत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये काम केलेले आहे. या निवडणुकीत ‘इव्हीएम’ला दोष देण्यात काही अर्थ नाही. लोकसभेत महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. त्यावेळेस ‘इव्हीएम’ खूप चांगले होते. विधानसभेला विरोधात निकाल लागला, तर ‘इव्हीएम’ला दोष द्यायला सुरुवात झाली. त्यांनी असे प्रकार थांबवावे,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.