मुंबई : विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि महायुतीच्या गळ्यात विजयाची माळ पडली, तिथेच दुसऱ्या बाजूला मविआचा चांगलाच सुपडा साफ झाला. विधानसभेच्या निवडणुकांचा हा निकाल विरोधकांच्या मात्र अद्याप पचनी पडल्याचे दिसून येत नाही. ईव्हीएम वर दोषारोप करण्याचे काम महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र महायुतीचे सरकार कामाला लागले असून, जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सगळे नेते सज्ज झाले आहेत. अशातच आता विधानसभा अध्यक्ष पदी पुन्हा राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड होणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
महायुतीच्या अडीज वर्षाच्या कारकीर्दीत राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाची कमान यशस्वीरित्या सांभाळली होती. यावेळेस देखील त्यांचीच निवड होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप तरी महायुतीमधील इतर कुठल्याही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.