घे गरूडापरी उंच भरारी...

    07-Dec-2024
Total Views | 39
 
 
Devendra Fadanvis
 
कठोर मेहनत, संयमी वृत्ती, विकासाची जिद्द, संघटनेचे बळ आणि जनसेवेचा ध्यास यांचे अतुलनीय मिश्रण म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! विरोधकांनी राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरही यथेच्छ चिखलफेक केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकांवर अढळ राहिले. तेव्हा, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ ते ‘अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता हैं’ याचा प्रत्यय यंदाच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिला. फडणवीसांच्या अशा या उंच गरुडभरारीच्या अद्वितीय यशाचा आलेख मांडणारा हा लेख...
 
पाच वर्षांपूर्वी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून १०५ जागा जिंकूनही उद्धव ठाकरेंनी भाजपशी गद्दारी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक संभाषणात ’मी पुन्हा येईन’ म्हणत देवेंद्र फडणवीस यांची वेळोवेळी खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस एकदा म्हणाले होते, “मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूँ, लौटकर फिर आऊँगा।”
 
आता देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने तोच समुद्र मुंबईच्या अरबी समुद्राच्या भरतीसारखा सर्व विरोधकांच्या नाकी नऊ आणत पुन्हा नव्याने आला आहे. नव्याने उभारी घेत दूरदृष्टीने महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेत हजर आहे.
 
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विरोधकांना अशा प्रकारे पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रदेशाध्यक्ष असताना २०१४च्या विधानसभा निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. त्यानंतर अचानक शिवसेनेशी युती तुटल्यानंतरही भाजपला १२२ जागा जिंकण्यात यश आले आणि राज्यात पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपला मुख्यमंत्री मिळाला. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत २०१९च्या विधानसभा निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. तेव्हा ते मुख्यमंत्री असताना पुढच्या मुख्यमंत्र्यांचा चेहराही त्यांचाच होता. असे संकेत ही वारंवार दिसून आले.
 
दुसरीकडे, महाराष्ट्रातील जनतेने भाजपला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागांचा कौल दिला होता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या लालसेमुळे भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अचानक केलेल्या पक्षांतरामुळे केवळ भाजप समर्थक आणि आमदारच दुःखी झाले नाहीत, तर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले बहुतांश आमदार आणि त्यांचे समर्थकही हैराण झाले होते. त्यांचा पक्ष सत्तेत आल्याने सत्ता मिळाल्याच्या आनंदात त्यांना कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता आली नाही. मात्र, अडीच वर्षांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काम करताना शिवसेनेच्या आमदारांचा श्वास कोंडू लागला होता.
हेच महत्त्वाचे कारण होते की, दि. २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शिवसेनेसारख्या शिस्तप्रिय, सुसंघटित आणि समर्पित पक्षातील इतर ३९ आमदारही त्यांना सामील झाले. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी कमालीची राजकीय कुशाग्रता दाखवली आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या निष्क्रियतेची किंमत त्यांच्या पक्षाच्या विभाजनाच्या रुपाने चुकवावी लागली.
 
दरम्यान, हे प्रकरण इथेच थांबले नाही. राष्ट्रवादीचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार २०१९च्या निवडणुकीनंतरच्या घटनांबाबत वेगवेगळी विधाने करत आपली हुशारी सिद्ध करायचे. जुलै २०२३च्या सुरुवातीलाच शरद पवार यांच्या पक्षात मोठी बंडखोरी झाली आणि त्यांचे ४० आमदारही भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले.
 
या घटनांपूर्वी फडणवीस यांनी जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत विरोधकांना पहिला धक्का दिला होता. राज्यसभा निवडणुकीत तीन पक्षीय महाविकास आघाडीने आपला चौथा उमेदवार जबरदस्तीने उभा केला होता. या निवडणुकीत फडणवीस यांनी मतांचा असा खेळ केला की, कमी संख्याबळ असतानाही भाजपच्या तिसर्‍या उमेदवाराला विजयी करण्यात यश मिळवले, तर सत्ताधारी आघाडीचा चौथा उमेदवार पराभूत झाला. पण, खरा खेळ दहा दिवसांनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत झाला.
 
दि. २० जून २०२२ रोजी झालेल्या या निवडणुकीत आपल्या मर्जीतील उमेदवारांना विजयी करण्यातही फडणवीस यशस्वी ठरले आणि विधान परिषदेची निवडणूक संपताच शिवसेना सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांच्या विरोधात बंड पुकारले. ठाकरे आपल्या १६ सहकार्‍यांसह सुरतला गेले. काही दिवसांनी ही संख्या ४० वर पोहोचली आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार गडगडले.
 
फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन केले आणि केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार ते स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले. मग त्यांच्या या वाटचालीची प्रशंसा खुद्द शरद पवारांनीच केली होती की, देवेंद्र हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत, जिथे वरिष्ठांचा आदेश सर्वतोपरि आहे.
 
आता त्याच संघाच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने भाजपलाच नव्हे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांनाही भरघोस यश व जागा मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत. सलग तिसर्‍यांदा १०० पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपने राजकारणात स्वतःचा आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे.
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत झालेल्या सभेत २०२४ मध्ये महाआघाडीचे सरकार आणि 2029 मध्ये भाजपचे सरकार असे लक्ष्य दिले होते. पण, भाजपचा आकडा बघितला, तर २०२४ मध्येच निव्वळ भाजपचे लक्ष्य गाठण्यात भाजपला चांगलेच यश संपादन केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या ‘एक हैं तो सेफ हैं’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
भाजपच्या या विक्रमी विजयात अनेक केंद्रीय नेते आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांची मेहनत तेवढीच उल्लेखनीय व मोलाची आहे. भाजप संघटनेने समर्पण आणि सहकार्याने ही विजयश्री मिळवली आहे, पण या विजयाचे खरे माणिक-मोती, शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत.
 
तथापि, माननीय पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या आव्हानांचे संधींमध्ये रुपांतर करण्याच्या परंपरेचे वाहक देवेंद्र फडणवीसदेखील आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील निकाल चांगले आले नाहीत, तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ केला होता. विरोधकांकडून होत असलेली खिल्ली, टोमणे याचा मारा सहन करत आगामी निवडणूक जिंकायची आहे, असा निर्धारही त्यांनी केला होता आणि तो निर्धार खरा करत विधानसभा निवडणुकीत विरोधकांना चपराक लगावली. खरे तर नेता असा असावा की, ज्याच्यात पराभवाची जबाबदारी घेण्याची क्षमता असेल आणि त्याचे यशात रुपांतर करण्याचा संकल्प घेऊन तो पूर्ण करू शकेल.
 
निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच, त्यांनी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची स्वप्ने पूर्ण करण्याचा, राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
 
गरुडाची खरी भरारी येत्या काळात महाराष्ट्रातील जनतेला दिसून येईलच. त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर त्यांनी नमूद केले आहे. गरुडासारखी सूक्ष्म दृष्टी असलेले फडणवीस आता आपल्या दूरदृष्टीने महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यात यशस्वी होतील, याबाबत तीळमात्रही शंका नाही. महाराष्ट्राचा वैविध्यपूर्ण विकास करत महाराष्ट्र हिंदुस्थानात अव्वल स्थान पटकावेल, हीच अपेक्षा!
 
आचार्य पवन त्रिपाठी 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121