नवी मुंबई विमानतळावर नुकतीच उड्डाण प्रमाणीकरण चाचणी यशस्वीरित्या पार पडली. येत्या नवीन वर्षात मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाच्या भविष्याचा वेध घेणारी हवाई वाहतूकतज्ञ आणि एमएबी एव्हिएशन संचालक मंदार भारदे यांची दै.‘मुंबई तरुण भारत’ने घेतलेली विशेष मुलाखत.
नवी मुंबई विमानतळाच्या प्रगतीबाबत काय वाटते?
मुंबईला अनेक वर्षांपासून नव्या विमानतळाची आवश्यकता होती. मुंबई विमानतळ हे त्यावेळच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार नियोजनकारांनी उभारले होते. पण मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आणि गरजेनुसार ते आता पुरेसे नाही. त्यामुळे मुंबईला आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता होती. त्यानुसार नवी मुंबईत ही जागा ठरविण्यात आली आणि विमानतळाचे काम सुरू झाले. खरे तर, दहा वर्षांपूर्वीच हे विमानतळ तयार व्हायला हवे होते. आज नवी मुंबई विमानतळ तयार होत असताना आपल्याला आणखी एका विमानतळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, नवी मुंबई विमानतळ हे स्वागतार्ह पाऊल आहे.
मुंबई विमानतळावरील भार नवी मुंबई विमानतळ कसा कमी करेल?
नवी मुंबई विमानतळामुळे मुख्य विमान तळावरील भार हलका होईल. आज कित्येक आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक एअरलाईन्सना आपल्या प्रवाशांना मुंबईत आणायचे आहे. मात्र, त्यांना स्लॉट मिळत नाहीत. यामुळे ते नवीन मार्ग सुरू करू शकत नाहीत. आज केवळ महाराष्ट्रातील 22 विमानतळांना मुंबईत प्रवेश हवा आहे. मात्र, त्यांना ‘आरसीएफ’च्या रूटमध्ये परवानगी मिळत नाही. नवी मुंबई विमानतळ झाल्यावर मुंबई शहर अनेक शहरांशी जोडले जाईल. नवी मुंबई विमानतळ हवाई वाहतूक क्षेत्रात क्रांतिकारक ठरेल!
नवी मुंबई शहराच्या विकासात विमानतळाचा प्रभाव कसा दिसेल?
जगभरात हे सिद्ध झाले आहे की, आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर हा आपोआपच त्या शहराचा प्राईम लोकेशन म्हणून ओळखला जाऊ लागतो. आजपर्यंत नवी मुंबई केवळ कष्टकरी, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांचा रहायचा प्रदेश असे जे स्थान होते, ते बदलून नवी मुंबई हे प्राईम प्रॉपर्टी असेल. सुदैवाने नवी मुंबईत मोठे रस्ते आहेत, पाणी आहे, गृहनिर्माण आहे. या सगळ्या सुविधा असणार इन्फ्रास्ट्रक्चर याठिकाणी आधीच आहे. पुढची 25 वर्षे नवी मुंबई विमानतळ हे मुंबईचा चेहरा बनेल. आगामी काळातही याच अनुषंगाने याभागात पायाभूत सुविधा उभारल्या जातील.
कोकण किनारपट्टीसाठी नवी मुंबई विमानतळाचे महत्त्व काय?
कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास मुंबई नंतर कोकण किनारपट्टीवर थेट गोव्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे या पट्ट्यात ज्या ज्या भागांना आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे, ती गरज नवी मुंबई विमानतळ पूर्ण करेल. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरीपर्यंतच्या नागरिकांना डोमेस्टिक म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. आज आपण मुंबईत अतिरिक्त प्रवासी विमान आणू शकत नाही, तिथे कार्गो वाहतुकीवर तर आणखी मर्यादा आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या बाबतीत हे निश्चित दिसून येत आहे की, उभारण्यात येत असलेले इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिरिक्त क्षमता असणारे आहे. यामुळे महाराष्ट्रातील भाजीपाला, फुले, फळे जगभरात जाऊ शकतात. नवी मुंबई विमानतळावरील कार्गोसेवेमुळे शेती, फार्मास्युटिकल, उद्योगधंदे आणि विविध छोट्या उद्योगांना जगभरात पोहोचण्याची संधी हे विमानतळ खुली करेल.
पालघर विमानतळामुळे पालघरचे चित्र कसे बदलेल?
राज्य सरकार पालघर विमानतळाचा विचार करत आहे. हा अत्यंत चांगला निर्णय आहे. गुजरात आणि पुढे कनेक्टिव्हिटीसाठी हे विमानतळ महत्त्वाचे आहे. वाढवण बंदराच्या उद्देशानेही हे विमानतळ महत्त्वाचेच आहे. आज जेव्हा एखाद्या परिसराचा पूर्ण विकास होताना आपण पाहात आहोत. त्यात फक्त विमानतळ नाही, तर त्याला जोडणारे रस्ते, मेट्रो, रेल्वे, ट्रक त्याचे पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था, सागरी मार्ग यांबाबत पुढील 50 वर्षांचा विचार करून डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा. एक विमानतळ हे फक्त स्थानिकांना रोजगार नाही, तर त्या भागाला जगाच्या नकाशावर आणते. पहिले विमानतळ मुंबईत बनले. तेव्हा आपल्याकडे भाऊचा धक्का होता. दुसरे विमानतळ तयार होत आहे. तेव्हा आपल्याकडे ‘जेएनपीटी’ बंदर आहे. वाढवण बंदर येणार, तेव्हा पालघर विमानतळाची जोड त्याला असेल. या परिसराचे वैभव टिकवून ठेवायचे असेल, तर आता इन्फ्रास्ट्रक्चर बनवावेच लागणार आहे. ते आपण बनवत आहोत, ही आनंदाची बाब आहे.
महाराष्ट्रातील सर्व विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू राहावी, यासाठी काय केले जावे असे वाटते?
चिपी विमानतळ, ओझर विमानतळ, संभाजीनगर विमानतळ, नागपूर, गोंदिया, नांदेड, जळगाव, कोल्हापूर ही विमानतळे आधीच तयार आहेत. मात्र, आजही केवळ कागदोपत्री आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आज यातील अनेक विमानतळे ही काही काळासाठी उघडली जातात. याच्या खोलात गेले की, लक्षात येते की स्टाफ पुरेसा नाही. म्हणून या विमानतळाच्या वेळेवर बंधन आहे. ही विमानतळे 24 तास सुरू ठेवावी लागतील, तेव्हा त्यांची मागणी वाढेल. राज्यातील पूर्ण वेळ वापरात नसणारी किमान दहा विमानतळे ही राज्य सरकारने 24 तासांसाठी खुली केली पाहिजेत. स्थानिक नगरपालिका, राज्य सरकार आणि ‘चेम्बर ऑफ कॉमर्स’ यांसारख्या संस्थांनी यामध्ये सहकार्य उभे केले पाहिजे. कस्टम इमिग्रेशन सर्वात मोठे आव्हान आहे. ते पार करून संपूर्ण राज्याची पॉलिसी बनवून जर हे केले, तरच हे इन्फ्रास्ट्रक्चर उपयोगाचे आहेत.
फनेल झोनमध्ये येणाऱ्या इमारतींच्या पुनर्विकासाचा विकास रखडतो. फनेल झोन महत्वाचा का?
फनेल झोन हा एक महत्वपूर्ण भाग आहे, तो लागतोच. यामध्ये काहीही होऊ शकत नाही . नवी मुंबई विमानतळासाठी असेल किंवा पालघर विमानतळ असेल त्याभागातील फनेल झोनमध्ये इमारती बांधूनच नका. जगभरात फनेलच काहीही झालेलं नाही. जर मी आकाशात एका ठिकाणावर आलो आणि विमानाला आग लागलेली आहे. अशावेळी मला माझी दिशा बदलावी लागेल. अशावेळी जर मध्ये मोठा टॉवर बांधलेला असेल तर विमानाने कसे जावे? शांघाय, दुबई यासारख्या देशांनी फनेलमध्ये इमारतींच्या विकासाला परवानगीच दिली नाही. त्याचपद्धतीने आपल्याकडेही झालं पाहिजे.
विमानतळाच्या अनुषंगाने रोजगाराच्या संधी नेमक्या कोणत्या?
एका अंदाजानुसार, मुंबई विमानतळावर आज घडीला 70 ते 75 हजार एंट्री पास तयार होतात. हा आकडा केवळ ज्यांचे रोज विमानतळावर काम असते, असा आहे. यांच्यामध्ये एका लोडरपासून ते पायलटपर्यंत आणि एका इंजिनिअरपासून कंपनीच्या एमडीपर्यंत अशा सर्वांचा यात समावेश असतो. यांच्या कुटुंबाची संख्या पाहिली, तर दोन ते अडीच लाख लोकांचे घर हे केवळ एका विमानतळावर अवलंबून आहे. एक विमानतळ येते, तेव्हा ते 70 ते 75 हजार रोजगार घेऊन येते, तेच नवी मुंबई विमानतळाच्या बाबतीत दिसून येईल.