रामकथेचा विश्वसंचार

    29-Dec-2024
Total Views | 26
Shree Ram

अयोध्येतील रामजन्मभूमीवरील भव्य राममंदिराच्या दि. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आणि रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या मंगल उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘संत साहित्यातील रामदर्शन’ या साप्ताहिक लेखमालेतील हा ५१वा लेखांक आहे. आजवरच्या लेखात आपण मराठी संतसाहित्यातील रामदर्शन केले. आता आपण भारतातील विविध प्रांतांमध्ये, विविध भाषेतील रामायणाची माहिती पुढील लेखापासून घेणार आहोत आणि एप्रिलमध्ये ‘रामनवमी’च्या मुहूर्तावर या लेखमालेचा समारोप होणार आहे. ‘रघुनाथे स्मरोनी कार्य करावे।’ असा समर्थांचा सांगावा आहे. त्याच बोधातून हे लेखन घडत आहे. ‘राम कर्ता, राम करविता’ आपण फक्त निमित्तमात्र आहोत.

फेडावया देवांची साकडी। स्वधर्म वाढवावया वाढी।
नामे मोक्षाची उभवावया गुढी। सूर्यवंशा गाढी दशा आली॥

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम हे भारतीयांचे सर्वाधिक भक्तजनप्रिय दैवत आहे. ‘राम नाम’ हा भक्तीविश्वातील ‘संजीवनी मंत्र’ आहे. राम हा अवतारी महापुरुष आहे, तसाच तो आपला राष्ट्रपुरुष आहे. समस्त हिंदूंचा आणि हिंदुस्थानचा प्राण आहे, ज्ञान आहे, सन्मान आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण या धाग्यांनीच हिंदुस्थानचे-हिंदू संस्कृतीचे महावस्त्र विणलेले आहे. ‘श्रीराम’ आणि ‘श्रीकृष्ण’ हे आमचे सर्वोच्च राष्ट्रीय सांस्कृतिक आदर्श आहेत आणि ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही सर्वश्रेष्ठ महाकाव्ये असली तरी, ती भारताचा वैभवशाली इतिहास, वसा आणि वारसा आहेत. या एैश्वर्यशाली-प्रेरणादायी सांस्कृतिक वारशाचे पुण्यस्मरण-चिंतन हाच या लेखमालेचा व्यापक उद्देश आहे.

‘चरितम् रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तर।’ अशा रामकथेचा एका साप्ताहिक लेखमालेच्या मर्यादेत समग्र संपूर्ण दर्शन अशक्य आहे. श्रीरामावर व रामकथेवर जगात जेवढे अवाढव्य, विपुल आणि विविधांगी साहित्य लिहिले गेले, तेवढे क्वचितच कोण्या कथेवर-पुरुषावर लिहिले गेले आहे. हे भाग्य रामकथेला लाभले. ‘रामकथा’ ही विश्व साहित्यातील सर्वश्रेष्ठ व आदि महाकाव्य आहे. समर्थ रामदासांनी रामकथेचा सर्व देवकथांमध्ये सर्व श्रेष्ठ कथा म्हणून ‘कथा थोर राघवाची।’ असा तिचा सार्थ-समर्पक गौरव केलेला आहे.

‘रघुनाथे स्मरोनी कार्य करावे।’

या समर्थांबोधाचे श्रद्धाभावाने अनुसरण करीत मी ही लेखमाला लिहिलेली आहे. म्हणूनच ती सिद्धीस गेलेली आहे. श्रीरामकृपेचाच हा प्रसाद आहे. मराठी संतसाहित्यातून होणारे विविधरंगी ‘रामदर्शन’ वाचकांना वर्षभर छोट्या-छोट्या लेखातून घडविण्याचा प्रयत्न मी ‘नित्यविजयी रघुनंदन’ या लेखमालेतून केला. ५१ लेखांच्या या लेखमालेला विचक्षण वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. वाचकांमुळेच ‘श्रीराम’ भक्ती प्रचाराचा, लेखमाला लिहिण्याचा व प्रकाशित करण्याचा उद्देश सफल सुफल झाला, याचा मला विशेष आनंद आहे.

श्रीरामाची पुरुषार्थी वीरश्रीयुक्त पराक्रम कथा आणि रामनामाचा महिमा हिंदू समाजात जागृती करून, सामाजिक ऐक्य, सामाजिक समरसता निर्माण करण्याचे सर्वाधिक प्रभावी साधन आहे. १३व्या शतकातील संत निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वरांपासून ते थेट २०व्या शतकातील संत साईबाबा, नामयोगी संत गोंदवलेकर यांच्या पर्यंतच्या संतसाहित्यातील ‘रामदर्शन’ आपण आजवरच्या ५० लेखांतून घेतले आहे.

राम एव परं ब्रह्म, राम एवं परं तपः ।
राम एव परं तत्त्व, श्रीरामो ब्रह्मतारकम ॥

रामरहस्योपनिषदमधील या श्लोकातील श्रीरामाच्या परब्रह्मरूपाचेच बहुतेक संतांनी अनुसरण करून रामाचे-रामनामाचे पूजन केले आहे. हे आपण त्यांच्या साहित्यातून पाहिले. संत एकनाथ, संत रामदास या दोन संतांनी रामकथेकडे ‘राष्ट्रीय कथा’ म्हणून पाहिले आणि पारतंत्र्यातील स्वधर्म, स्वदेश, स्वसंस्कृती विन्मुख हतबल हिंदू समाजात पुरुषार्थाचे जनजागरण केले. ‘रामाची पदे मानसी धरीन। विश्व उद्धारीन हेळामात्रे।’ ही समर्थांची उक्ती त्यांच्या लोकजागरण कार्याची ग्वाही आहे. अशाप्रकारे संतसाहित्यातील १)परब्रह्म श्रीराम आणि २) कोदंडधारी रघुवीर अशा दोन प्रकारच्या रामरूपाचे आपण शब्ददर्शन केलेले आहे. ‘भावार्थ रामायण’ लिहून संत एकनाथांनी मराठी भाषेत वीरश्रीयुक्त संपूर्ण रामकथा प्रथम सांगितली. मराठी संतांनी अभंग, ओव्यातून जी रामकथा गायली ती वाल्मिकी रामायणापेक्षा ‘आनंद रामायण’, ‘अध्यात्म रामायण’ या विविध रामायणातील कथाभागावर आधारित आहे. रामकथा गाताना सकल संतांनी राम, कृष्ण, हरी, शिव या सर्वांना एकाच ईश्वरीतत्त्वाची विविध रूपे, असे ‘अद्वैत’ दृष्टीने पाहिलेले आहे. या एकात्म, अद्वैत विचाराचे दर्शन हाच लेखमालेचा बोध आहे.

रामकथेचा देश-विदेशातील ‘विश्वसंचार’ सार्‍या जगाला थक्क करणारा आहे. आता पुढील लेखांमध्ये आपण फक्त भारताच्या विविध प्रांतातील, विविध भाषेतील वैविध्यपूर्ण रामकथांमधील रामदर्शन करणार आहोत. हिंदी भाषेतील सर्वश्रेष्ठ काव्य म्हणून गोस्वामी तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’, तामिळमधील कवी कम्बाचे ‘कम्बरामायण’, आसाममधील माधव कंदलीचे ‘सप्तकांड रामायण’, बंगाली भाषेतील ‘कृत्तवासी रामायण’, शीख दशमगुरू गोविंदसिंहजी यांचे ‘रामावतार’ कन्नड भाषेतील ‘तोरवे रामायण’ या व अशा प्रादेशिक भाषेतील रामायणाचे आपण लेखांच्या मर्यादेत शब्ददर्शन घेणार आहोत.

दि. २२ जानेवारी २०२५ रोजी, अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचा पहिला वर्धापनदिन आहे. तो देशभर दिवाळीसारखा उत्साहाने-स्वाभिमानाने साजरा होणार आहे. आपण सर्व या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहोत, हे आपले भाग्य आहे.

॥ जय श्रीराम ॥

विद्याधर ताठे
(पुढील अंकात : गोस्वामी तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’)
९८८१९०९७७५
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121