मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘सीआयडी’ला आदेश; फोटोबाजांच्या बंदुकांचे परवानेही रद्द होणार
29-Dec-2024
Total Views | 28
मुंबई : “बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा,” असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी ‘सीआयडी’च्या अतिरिक्त महासंचालकांना दिले आहेत. त्याचबरोबर बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील, तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे निर्देश बीड पोलीस अधीक्षकांना देताना, तातडीने फेरआढावा घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाजवळ आवाडा कंपनीचा ‘पवन ऊर्जा प्रकल्प’ असून, त्यांच्याकडून दोन कोटी रुपये खंडणी मागण्यात आली होती. त्यावरून वाद आणि हाणामारी झाली.यावेळी मार खालेल्या आरोपींनी संतोष देशमुख यांना गाठून त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये विविध पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
दरम्यान, बीडमधील सर्वपक्षीय मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार प्रकाश सोळंकेही सहभागी झाले. संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शनिवारी सकाळी ११ वाजता बीडच्या डॉ. आंबेडकर चौकातून या सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झाली. माळीवेस, अण्णा भाऊ साठे चौक, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत तो पोहोचला. मोर्चामध्ये स्थानिक खा. बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संभाजीराजे छत्रपती, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला.
अभिनेत्री प्राजक्ता माळीची सुरेश धसांविरोधात महिला आयोगाकडे धाव
बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाविषयी भाष्य करीत असताना, आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यामुळे त्यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. “त्यांनी माझी जाहीर माफी मागावी,” अशी मागणी प्राजक्त माळी हीने केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ती म्हणाली, “गेल्या दीड महिन्यांपासून हे सुरू आहे. पण, हतबलता म्हणून मी शांत बसले. लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, तेव्हा बोलणे गरजेचे आहे. राजकारणात महिला कलाकरांना का खेचता? बीडमध्ये कधी पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्ही केवळ महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहात. यातून तुमची मानसिकता दिसते. सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी. माझीच नाही, तर इतर अभिनेत्रींचीही त्यांनी नावे घेतली असून त्यांचीही माफी मागावी. धस यांनी माफी न मागितल्यास कायदेशी कारवाईला सामोरे जावे,” असा इशाराही तिने दिला आहे."
प्रसार माध्यमांसमोर कसे बोलावे, हे त्यांनी शिकून घेतले पाहिजे. अशा लोकांमुळे आमचे कलाक्षेत्र बदमान होत आहे. करुणाताई मुंडे यांना मिळलेली माहिती चुकीची आहे. महिला आयोगाकडे त्यांचीही तक्रार केली आहे. पण, त्यानंतर त्या गप्प होत्या, म्हणून मी नंतर शांत होते. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार, असल्याचे प्राजक्ता माळीने स्पष्ट केले.