मुंबई, दि.२८ : प्रतिनिधी मुंबईतील वातावरण मागील २-३ दिवसांपासून धुरकट झाल्याचे चित्र आहे. अशावेळी मुंबईतील प्रमुख आणि छोट्या रस्त्यांवरील स्वच्छता व धूळ प्रतिबंधासाठी रस्त्यांवर नियमितपणे ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे पाणी फवारणी केली जात आहे. या सोबतच रस्ते ब्रशिंग करून, पाण्याने धुवून काढण्यासाठी १०० टॅंकर तैनात करण्यात आले आहेत. त्याद्वारे धूळ प्रतिबंध उपाययोजना केली जात आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
वातावरणातील बदलांमुळे बृहन्मुंबई क्षेत्रासह (मुंबई शहर आणि उपनगर) मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याच पार्श्वभूमीवर, बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरुन वायू प्रदूषण होणार नाही. रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ, जी प्रामुख्याने प्रदूषणास कारणीभूत ठरते, ती नियंत्रित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. २४ प्रशासकीय विभागांमध्ये ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) पाणी फवारणी केली जात आहे. ज्या ठिकाणी बांधकाम , पाडकाम, खोदकाम सुरू आहे,अशा ठिकाणी प्रकर्षाने पाणी फवारणी केली जात आहे.
रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुवून काढण्यासाठी १०० टॅंकर तैनात करण्यात आले आहेत. त्यात ५ हजार लीटर क्षमतेच्या ६७ आणि ९ हजार लीटर क्षमतेच्या ३९ टॅंकरचा समावेश आहे. रस्ते, पदपथ स्वच्छतेसाठी ई - स्वीपर संयंत्राचा अवलंब करण्यात येत आहे. जेणेकरून धूळीस प्रतिबंध करणे शक्य होईल. खुल्या जागेत किंवा मोकळ्या जागेत बांधकामाच्या साहित्यावर नियमितपणे पाणी फवारणी होत असल्याची खातरजमा केली जात आहे. बांधकामाच्या ठिकाणी धूळीचे कण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा राडारोडा / अन्य साहित्यावर सातत्याने आणि न चुकता पाण्याची फवारणी केली जात आहे. स्प्रिंकलर्स आणि स्थिर / फिरत्या अँटी स्मॉग गनचा वापर केला जात आहे. बांधकाम प्रकल्पस्थळी बाहेर पडण्याच्या ठिकाणी वाहनांची चाके धुण्याची सुविधा बंधनकारक करण्यात आली आहे.