‘चौथ्या मुंबई’चे विकासचित्र

    27-Dec-2024
Total Views | 85
4th Mumbai

मुंबईतील घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे आणि जागांची कमतरता पाहता, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, वसई-विरारसारख्या ‘सॅटेलाईट सिटी’मध्ये नागरी वस्त्यांचा प्रचंड विस्तार झाला. ‘दुसरी मुंबई’ अर्थातच नवी मुंबईची क्षमताही येत्या काळात अपुरी पडेल, अशी स्थिती. सध्या पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेगवान अटल सेतू, ‘जेएनपीटी’, नैना क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात ‘तिसरी मुंबई’ उभी राहत आहे. ‘तिसरी मुंबई’ वेगाने विकसित होत असताना, आता पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरामुळे या क्षेत्रात ‘चौथी मुंबई’ देखील बाळसे धरत आहे. अशा या ‘चौथ्या मुंबई’च्या विस्ताराचा रोडमॅप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच विधानसभेतील आपल्या भाषणातून सादर केला. त्यानिमित्ताने या ‘चौथ्या मुंबई’चे विकासचित्र मांडणारा हा लेख...

दि. १ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्रातील ३६वा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आला. यानंतर अवघ्या दोन महिन्यांत राज्यात सत्तांतर झाले. दि. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात सत्तेवर आले. पालघरच्या प्रगतीची वाटचाल येथूनच सुरू झाली. पालघर मतदारसंघात एकूण आठ तालुके आहेत आणि त्यात पालघर, डहाणू, वसई, बोईसर, नालासोपारा आणि विक्रमगड या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. २०११च्या जनगणनेनुसार, या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे तीन दशलक्ष होती, तर ५४ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. पालघर जिल्हा मुंबईपासून फक्त १३० किमी अंतरावर असला तरी डहाणूपर्यंत पोहोचण्याचा रस्ता सोपा नाही. मात्र, आज पालघर जिल्हा मुख्य पायाभूत सुविधांसाठी विकासाच्या टप्प्यावर आहे. वाढवण बंदरापासून ते महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनपर्यंत केंद्र सरकारचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज पालघरमध्ये निर्माणाधीन आहेत.

वाढवण बंदर प्रकल्प

पालघरमध्ये उभारण्यात येणारे वाढवण बंदर हे केवळ जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे विकासचित्र पालटणारे ठरणार आहे. या बंदरामुळे पालघरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. वाढवण बंदराची प्रस्तावित जागा ही नैसर्गिकरित्याच २० मीटर खोल आहे. इतके खोल असणारे हे भारतातील एकमेव बंदर असेल. या खोलीमुळे जगातील सर्वांत मोठी कंटेनर जहाजे भारतात दाखल होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ३० ऑगस्ट रोजी वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असला, तरी राज्य सरकार म्हणून लागणार्‍या सर्व परवानग्या मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलद प्रक्रिया पार पडली. इतकेच नाही, तर या बंदराचे काम पूर्ण होईपर्यंत पालघरमध्ये नवे विमानतळ आणि रस्ते प्रकल्पांची उभारणीही करण्यात येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

वाढवण बंदरामुळे दरवर्षी २९८ दशलक्ष मॅट्रिक टन मालाची हाताळणी करणे शक्य होणार आहे. त्यात सुमारे २३.२ दशलक्ष टीईयू कंटेनर हाताळणी क्षमतेचा समावेश असेल. आज देशातील एकूण कंटेनर ट्रॅफिकपैकी ७० टक्के कंटेनर ट्रॅफिक एकटे ‘जेएनपीए’ बंदर हाताळते. या ‘जेएनपीटी’ बंदराच्या तीनपट मोठे वाढवण बंदर असेल. वाढवण बंदर प्रकल्प हा महाराष्ट्र सरकार आणि ‘जेएनपीटी’ यांचा संयुक्त उपक्रम आहे. एका कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल. वाढवण बंदर उभारल्यास येथील लाखो नागरिकांना रोजगार मिळणार असून देशाच्या विकासाला नवी चालना मिळेल.

मुंबईचे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ

वाढवण बंदराला लागूनच मुंबईतील तिसरे विमानतळ उभारण्यात येईल. पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक क्षेत्र असल्याने प्रकल्पांसाठीच्या जागांवर मर्यादा आहेत. मात्र, वाढवण बंदराला लागूनच ‘रिक्लेमशन’ करून हे नवे विमानतळ उभारण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही मागणी मान्य केली आहे. यामुळे वसई-विरारपासून पुढे पालघरकडे ‘चौथी मुंबई’ म्हणजे आणखीन एक महानगर वसविले जाईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

वर्सोवा-विरार-पालघर सी-लिंक

चौथ्या मुंबईच्या निर्माणात वाढवण बंदर हा प्रकल्प जितका महत्त्वाचा,तितकाच वर्सोवा-विरार-पालघर सी-लिंक हा प्रकल्पही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नरिमन पॉईंट ते पालघर हा प्रवास केवळ एक तासांत करणे शक्य होईल. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई ते विरार असा ४३ किमी लांबीचा वर्सोवा-विरार सी-लिंक बांधण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाला पश्चिम उपनगरात जाणारे सहा पदरी जोडरस्ते असतील. हाच मार्ग पुढे उत्तन आणि पालघरपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. वर्सोवा-विरार-पालघर हा सागरी सेतू पालघरला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. रस्तामार्गे विरार ते पालघर ५४.६ किमी अंतर आहे.

मुंबई मेट्रो-१३

वसई शहरवासीयांसाठी मेट्रोमार्ग-१३ची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत मिरा-भाईंदर ते वसई-विरार हा मेट्रो मार्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दि. ९ जुलै २०२४ रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. वसई-विरारची एकूण लोकसंख्या आणि मिरा-भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्षात घेऊन हा मेट्रो मार्ग हाती घेण्यात आला आहे. मीरा रोड ते विरार हा २३ किमीचा मेट्रो मार्ग असून, त्यात २० स्थानकांचा समावेश आहे. वसई-विरार शहरासाठी मेट्रोला मान्यता मिळाली असली, तरी मध्ये खाडी असल्याने मेट्रो मार्गाच्या उभारणीत अडचणी होत्या. मात्र, वसईच्या खाडीवर महाराष्ट्रातील दुसरा डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे. या पुलावर खाली वाहनांसाठी रस्ता असणार आहे, तर एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वेचे ट्रॅक आणि खाली वाहनांसाठी पूल अशी रचना असेल. मुंबई-अहमदाबाद हायवे हा वसई आणि भाईंदरला जोडणारा एकमेव पर्याय आहे. या प्रवासात बराच वेळ जातो. मात्र, या मेट्रो मार्गामुळे वसई आणि भाईंदरला रस्ते आणि मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे एकूण चार थांबे आहेत. त्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर या स्थानकांचा समावेश आहे. या बुलेट ट्रेन स्थानक परिसरात विविध विकासकामांचे नियोजन असेल. तसेच नागरी वसाहती आणि व्यवसाय केंद्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्थानकापासून ५०० मीटर परिसरात, एक किमी परिसरात आणि दोन किमी परिसरात प्रकल्पामुळे नागरीकरण वाढण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने नागरी सुविधांबाबतची विकासकामे केली जातील. यात रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, इमारती, रुग्णालये आणि इतर कामांचा समावेश असेल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग पालघर जिल्ह्यातील ७३ गावांतून जात आहे. यात वसई-विरारमधील २१ गावांचा समावेश आहे.

एकूणच ‘चौथ्या मुंबई’च्या निर्माणासाठी पालघरमध्ये जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाढवण बंदर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ, मुंबईतून थेट पालघरला जोडणारा सागरी मार्ग, बुलेट ट्रेन असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या पाच वर्षांत वेगाने पूर्ण होत असताना आपल्याला दिसून येतील. यासोबतच, मोठ्या संख्येने ‘पंतप्रधान आवास योजने’तून परवडणार्‍या घरांची निर्मिती, मेट्रोचे जाळेही उभारले जाईल. त्यामुळे आकाराला येणारी ही ‘चौथी मुंबई’ महाराष्ट्राचा सर्वांगीण कायापालट करणारी ठरेल, यात शंका नाही.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121