राम मंदिर बांधण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा 'हात' : संजय राऊत
काँग्रेसची तळी उचलण्याचा प्रयत्न
22-Dec-2024
Total Views | 130
1
मुंबई : "राम मंदिर बांधणीसाठी मोदी कुठेच नव्हते," असे म्हणत संजय राऊतांनी पुन्हा आपली बेताल वक्तव्याचा सूर कायम ठेवल्याचे दिसून आले. राम मंदिराच्या ( Ram Mandir ) बांधकामात काँग्रेस नेत्यांचाही हात असल्याचे राऊतांनी सांगितले. "नरसिंहराव, डॉ. शंकरदास शर्मा यांसारखे लोक केंद्रात नसते तर मंदिर बनलेच नसते," असा पोकळ दावादेखील राऊतांनी केला आहे.
राम मंदिराच्या स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेहनत न पाहताच संजय राऊतांनी आपल्या उडवाउडवी शैलीत बेताल वक्तव्य केले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "रामाला मोदींनी आणले, राम मंदिर मोदींनी बनवले, हे जे काही बोलले जाते ते दुर्दैवी आहे. मंदिर बनवल्याने कोणी नेता होत नाही. राम मंदिरस्थापनेत काँग्रेस पार्टीचे नेतेही सामील होते. जर नरसिंहराव, डॉ. शंकरदास शर्मा यांसारखे लोक केंद्रात नसते तर मंदिर बनलेच नसते."
"राम मंदिराच्या बांधणीत मोदी कुठेच नव्हते." असे म्हणत राऊतांनी आपल्या बेताल वक्तव्यांचा कळस गाठला आहे. याआधीही अशाप्रकारेच निरर्थक वक्तव्य करित त्यांनी सत्ताधारी पक्षांबाबत वेगवेगळी विधाने केली आहेत. तसेच राऊतांच्या पत्रकार परिषदेतदेखील त्यांची भाष्ये ही तकलादू असलेली दिसून येतात. हेदेखील त्यातीलच एक उदाहरण आहे.