हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन
21-Dec-2024
Total Views |
नागपूर : (Maharashtra Assembly) गेल्या सहा दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. दि. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २६ फेब्रुवारी पासून मुंबईत होणार आहे.
अधिवेशन समाप्तीची घोषणा करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज ६ दिवस (४६ तास २६ मिनिटे) चालले. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदाही ते तहकूब करावे लागले नाही. त्यामुळे सभागृहाचा वेळ वाया गेला नाही. हिवाळी अधिवेशनकाळात दिवसाचे सरासरी कामकाज ७ तास ४४ मिनिटे चालले.
हिवाळी अधिवेशनात तब्बल १७७ औचित्याचे मुद्दे चर्चेत आले. १३ शासकीय विधेयके संमत करण्यात आली. १५ व्या विधानसभेत एकूण ७८ आमदार प्रथमच निवडून आलेले आहेत. त्यातील अनेक आमदारांनी पहिल्याच अधिवेशनाच्या कामकाजामध्ये उत्तम सहभाग नोंदवला.
आमदारांच्या उपस्थितीवर नजर
हिवाळी अधिवेशनात आमदारांची सर्वाधिक उपस्थिती ८७.८० टक्के, तर सर्वात कमी उपस्थिती ४८.३७ टक्के इतकी होती. एकूण उपस्थितीचे सरासरी प्रमाण ७२.९० टक्के इतके होते. यापुढचे अधिवेशन मुंबईमध्ये सोमवार, ३ मार्च २०२५ पासून सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.