विजय तरवडे : एक गुणी विद्यार्थी व लेखक

    21-Dec-2024
Total Views | 70
 
 
विजय तरवडे
 
 
पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक विजय तरवडे यांनी दि. 18 डिसेंबर रोजी वयाची सत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांचे शिक्षक प्रा. श्याम अत्रे यांनी त्यांच्या विद्यार्थीजीवनाचा व साहित्यिक योगदानाचा आढावा घेतलेला हा लेख...

1966 ते 1971 हा माझ्या आयुष्यातील पाच वर्षांचा मंतरलेला कालखंड होता. या काळात माझे पुण्यात वास्तव्य होते. एकीकडे ‘एम.ए.(इंग्रजी)’चा अभ्यास आणि दुसरीकडे शिवाजीनगरमधील ‘भारत इंग्लिश स्कूल’मधील शिक्षकाची नोकरी. शिकणे आणि शिकवणे दोन्हीचा आनंददायी अनुभव एकाच वेळी घेत होतो. शेकडो विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, सहकारी शिक्षकांचे भरभरुन प्रेम मला या काळात मिळाले. अनेक विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत माझा संपर्क होता. समाजमाध्यमांच्या या युगात त्यातील कित्येक जण आजही माझ्या संपर्कात आहेत. आमचा नेहमी संवाद होत असतो. त्यातील दोन ठळक नावे म्हणजे, अविनाश आव्हाड आणि विजय तरवडे. दोघांचाही पिंड वेगळा. दोघेही अत्यंत हुशार आणि बुद्धिमान. दोघेही टेक्निकल तुकडीतील विद्यार्थी. अविनाश सरळमार्गी. पुढे इंजिनिअर झाला. रितसर नोकरी करुन सांसारिक जीवनात अतिशय यशस्वी झाला, तर विजय वाट चुकलेला वाटसरु. चुकून टेक्निकल शाखेकडे आलेला. त्याचा पिंड कलेचा, साहित्याचा. छिन्नी-हातोड्यापेक्षा लेखणी त्याला प्रिय. वाचनात त्याला विशेष रस. वृत्तीने हरफन मौला. चाकोरीबाहेरचा स्वतंत्र विचार करणारा. खट्याळ आणि फिरक्या घेणारा. सदैव हसतमुख आणि आनंदी. आपला मार्ग चुकला, हे त्याच्या वेळीच लक्षात आले आणि विशेष म्हणजे, आपली चूक त्याने वेळीच दुरुस्त केली. त्याने ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त कला शाखेत प्रवेश घेतला. आपली मूळ आवड व कल त्याने ओळखला व आयुष्याचे सोने करुन घेतले. फर्ग्युसन महाविद्यालयातील समूळ सांस्कृतिक वातावरण तेथील ‘साहित्य सहकार’ ही साहित्यविषयक चळवळ, इंग्रजी विभाग यात तो रमला. क्रमिक पुस्तके वा विषय या पलीकडचे शिक्षण त्याने येथे घेतले. भरपूर अवांतर वाचन, अभ्यासेत्तर उपक्रमातील सहभाग यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व चहू अंगांनी फुलले. जीवनाचे ध्येय, गंतव्य स्थान व दिशा त्याला इथे सापडली. मग त्याने मागे वळून कधी पाहिलेच नाही. आपल्या पिंडाशी, मूळ प्रवृत्तीशी तो प्रामाणिक राहिला. वाचन, मनन, चिंतन, व्यामिश्र जीवनानुभव आणि त्या सर्व संयुगांचे सकस लेखनात रुपांतर यात तो मनापासून रमला.
 
मी त्याला, त्याच्या वर्गाला, तीन वर्षे इंग्रजी शिकवले. केवळ भाषा नव्हे, तर त्या भाषेतील सकस साहित्य शिकवले. साहित्याकडे बघण्याची दृष्टी दिली. विजयसारख्या संवदेनशील विद्यार्थ्याने ती ग्रहण केली. मी त्या काळात ‘एम.ए.’चा अभ्यास करीत असल्याने क्रमिक पुस्तकातील धडे शिकवताना व्यापक इंग्रजी साहित्याचे व साहित्यकारांचे संदर्भ देत असे. भाषेची वैशिष्ट्ये समजावून सांगण्यात मला विशेष रस होता. चौकटीबाहेरचा विचार करणारे विद्यार्थी मला आवडत. विजय तरवडे हा त्यातील एक. तो म्हणतो, “श्यामकांत अत्रे, श्रीकृष्ण वैद्य आणि प्रा. झिया करीम यांनी माझ्या भाषिक व साहित्यिक जीवनाला दिशा दिली.” त्याची मनापासून कबुली त्याने अनेकदा दिली आहे. अविनाश आव्हाड हा तसाच कृतज्ञता बुद्धी असलेला माझा विद्यार्थी समाजमाध्यमावरील एका टिपणात लिहितो, “सर, शाळेतले ते जादुई दिवस आठवले. आम्ही मुलं तुमची पहिलीच बॅच अन् तुम्ही आमचे पहिलेच शिक्षक, ज्यांना ’ाशपीेींळपस’चे महत्त्व समजायचे आणि ते करणे जमायचेदेखील. तसे तुम्ही पहिलेे आणि एकटेच. असे तुम्ही एकटेच असणे जरी निराशाजनक भासले तरी अशी एकच व्यक्ती पुरेशी असते, ही बाब दिलासादायक.” विजय आणि अविनाश एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघेही आत्मीयतेने आजही संवाद व संपर्क राखून आहेत. शिक्षकाला तसे वेगळे काय हवे असते?
 
पुढे विजय ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी,’ असे घोषवाक्य असलेल्या ‘आयुर्विमा महामंडळा’त सांसारिक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी नोकरीला लागला असला, तरी आपल्यातला सृजनशील साहित्यिक त्याने कधीच दुर्लक्षित केला नाही. त्यामुळेच आज तो सुमारे 50 पुस्तकांचा लेखक म्हणून साहित्यविश्वात मान्यता प्राप्त आहे. त्याच्या या वाड्मयीन कारकिर्दीचा हा संदर्भत्र आढावा.
 
इयत्ता नववीत असताना ‘मराठी मन बोलतंय’ या शीर्षकाचे त्याचे पत्र सा. ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध झाले. अकरावीत असताना त्याचे विनोद सा. ‘स्वराज्य’मध्ये प्रसिद्ध झाले, तर कॉलेजच्या पहिल्यावर्षी त्याची ‘रेवती’ ही पहिली लघुकथा सा. ‘स्वराज्य’मध्ये प्रकाशित झाली. ही त्याची साहित्यविश्वातील पहिली पावले.
 
पुढे 1984 साली त्याची सा. ‘साधना’शी भेट झाली. त्यावेळी ‘साधना’ची संपादकीय जबाबदारी प्रा. वसंत बापट व प्रा. ग. प्र. प्रधान यांच्याकडे होती. त्यांनी विजयची लेखनक्षमता जोखली व त्याने ‘साधना’त ‘मधुसंचय’ नावाचे सदर लिहिले. त्यानंतर त्याने मागील 40 वर्षांत साहित्याच्या विविध प्रकारात जे योगदान दिले, तो प्रवास अजूनही सुरुच आहे.
 
विजयने स्वत:ला कोणत्याच विचारसरणीशी बांधून घेतले नाही. त्याचा कल जरी डाव्या विचारसरणीकडे काहीसा झुकलेला असला, तरी उजव्या विचारसरणीचे त्याला वावडे नाही. त्यामुळे सा. ‘साधना’पासून दै. ‘मुंबई तरुण भारत’पर्यंत त्याचा साहित्य संचार झालेला दिसतो. ‘सकाळ’, ‘केसरी’, ‘सामना’, ‘सा.सकाळ’, ‘लोकसत्ता’, बेळगावचा ‘तरुण भारत’, ‘प्रभात’, ‘पुण्य नगरी’ अशा विविध दैनिकांतून/साप्ताहिकांतून त्याने विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले आहे व ते पुस्तकरुपाने प्रसिद्धही झाले आहे. त्याला साहित्य जगतातील कोणताही विषय अविषय वाटत नाही. कथा, कविता, कादंबरी, विनोदी लेखन, चरित्र, ललित लेख, अनुवाद, वैज्ञानिक वाड्मय अपराध व भयकथा, अशा विविध साहित्य प्रकारांत त्याने विपुल लेखन केले आहे. काही साहित्यिकांच्या साहित्याचे संपादित खंडही त्याने प्रकाशित केले.
 
विजयचे जीवन व्यामिश्र अनुभवांनी समृद्ध झालेले आहे. आजूबाजूचे जग, त्यातील माणसे आरपार बघायला, ओळखायला तो शिकला. सर्वस्पर्शी वाचन आणि भाषेवरील प्रभुत्व या भांडवलावर तो लेखक झाला. स्वत:चा एक चाहतावर्ग त्याने निर्माण केला. आपण फार मोठे साहित्यिक आहोत, असा आव न आणता साहित्यविश्वात त्याने आपला अमिट ठसा उमटविला. गुरुला मागे टाकून शिष्य फार पुढे निघून गेला. वास्तवाचे भान न सुटलेला व जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा असलेला तो साहित्यिक आहे. विजयला माणसं जोडण्याची कला फार चांगली अवगत आहे. तो उत्तम खवय्या आहे. माणसाच्या घोळक्यात राहायला त्याला खूप आवडते. त्याने लिहिलेले ‘माणसं’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक मला खूप आवडते. मानवी स्वभावाचे सर्व कंगोरे, वैशिष्ट्ये त्याने मोठ्या खुबीने त्यात टिपली आहेत. त्याचा हात सतत लिहिता राहो. हाच शुभाशीर्वाद आणि मन:पुर्वक शुभेच्छा! जीवेत् शरद शतम्!

प्रा. श्याम अत्रे
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121