नागपूर : (Eknath Shinde) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी १७ डिसेंबर रोजी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा भेट झाली असे सांगण्यात आले असले तरी राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु आहे. या भेटीचे वेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि भाजप यांचे राजकीय संबंध पूर्ववत होऊन ते पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चां सुरु आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटू शकतं, त्यांना सगळेच भेटतात, त्यांना विरोधी पक्षही भेटतो आणि इतर सगळ्या पक्षाचे नेतेही भेटतात. पण हे चित्र पाहिल्यानंतर आपण यांच्याबद्दल काय शब्द वापरले होते याचे आत्मपरीक्षण करायला हवे, हे जे अडीच वर्ष आमच्या सरकारवर आरोप करणारे, टोकाची टीका-टिप्पणी करणारे, संपवण्याची भाषा करणारे, असे त्यांना भेटायला जातात, ही चांगली बाब आहे.”
“यापूर्वी २०२०-२१ मध्ये मला आणि देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचं जे कारस्थान केलं, ते जगजाहीर आहे. लोकसभेच्या विजयानंतर ते इतके हुरळून गेले की, त्यांनी मंत्रीमंडळाचं वाटपदेखील केलं होतं. तसेच त्यांनी आम्हा सगळ्यांना तुरुंगात टाकण्याचं ठरवलं होतं. देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकू म्हणणाऱ्यांच्या वागण्यात असा अमूलाग्र बदल झालेला दिसतो, ही खरंतर चांगली गोष्ट आहे. पण याला भेट, त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरीच थेट, अशी त्यांची परंपराच आहे,” अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला आहे.