येत्या दोन दिवसांत खातेवाटप पुर्ण करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या जनतेला ऊर्जा मिळेल असा कारभार करण्याचा प्रयत्न करू
15-Dec-2024
Total Views |
नागपूर : "हिवाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला उब आणि ऊर्जा मिळेल असा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही करू. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यात ६ राज्यमंत्री आहेत. आजपासून आम्ही आमचा गतिशील कारभार सुरु केलेला आहे. येत्या दोन दिवसांत खातेवाटप आम्ही पुर्ण करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री ( CM ) देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. रविवार, १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरील चर्चा आणि त्यासोबतच जवळपास २० विधेयके अधिवेशनात येणार आहेत. मागच्या काळात निवडणुकीपूर्वी निघालेले अध्यादेश यावेळी विधेयकांमध्ये कन्वर्ट होणार असून चांगले कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांनी मागच्याच अधिवेशनातील पत्रात एक ईव्हीएमचा पॅराग्राफ टाकून आम्हाला ते दिले आहे. त्यांनी पत्रामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेत त्याची उत्तरे वारंवार आम्ही दिली आहेत. तसेच विरोधक जितके वेळा ते मुद्दे उपस्थित करतील तितक्या वेळा आम्ही निश्चितपणे त्याची उत्तरे देऊ. महाराष्ट्रात एक गतिशील सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे."
विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भात फेक नरेटिव्ह!
"विरोधक ईव्हीएम संदर्भात एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचेदेखील उत्तर आम्ही चर्चेदरम्यान देऊ. 'Every vote for Maharashtra' असा या ईव्हीएमचा अर्थ आहे. महाष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरिता मतदान केले आहे. त्यामुळे आमचे सरकार हे ईव्हीएमचे सरकार असून त्या ईव्हीएमचा अर्थ Every vote for magnetic Maharashtra असा आहे. तो महाराष्ट्र घडवण्याकरिता आम्ही पुढचा कारभार करू," असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "सोयाबिन खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या १५ वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहेत. मागच्या वर्षी सोयाबिन आणि कापसाकरिता भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांना पैसे दिले. दुध उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत केली आणि सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिलो. परभणीच्या घटनेत एका मनोरुग्णाने ज्याप्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्याला अटक करण्यात आली आहे. दुर्दैवाने त्यानंतर एक उद्रेकदेखील झाला. पण अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणे योग्य नाही. हे बाबासाहेबांनादेखील कधीच मंजूर झाले नसते. हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे सरकार आहे. कुठल्याही परिस्थितीत संविधानापेक्षा वेगळे काम हे सरकार करणार नाही. आम्ही सर्वांनी ज्या संविधानाची शपथ घेतली त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल."
"बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येची घटना अतिशय निर्घृण आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडले जाणार नाही. या घटना गांभीर्याने घेतल्या जाईल. विरोधकांनी तीन-चार विषय उपस्थित केले असून सभागृहात त्याचे सविस्तर उत्तर आम्ही देऊ. विरोधकांनी सगळी चर्चा करावी. आम्ही त्यांचा आवाज दाबणार नाही आणि चर्चेपासून मागे हटणार नाही. आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे. फक्त लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि माध्यमांसमोर बोलायचे, हे योग्य नाही. हे लोकशाहीविरोधी आहे. सभागृहात बोलून माध्यमांमध्ये कव्हर झाले तर ती खरी लोकशाही आहे. पण सभागृहात न बोलता माध्यमांसमोर बोलण्याची लोकशाही जर विरोधक चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील सामान्य माणसाला आणि विदर्भातील जनतेला जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करू. विरोधकांनी सभागृहात चांगल्या प्रकारची चर्चा करावी," असे आवाहन त्यांनी केले. तसेच विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. खातेवाटपाबाबत आमचे एकमत झाले असून पालकमंत्रीपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बसून आम्ही पालक मंत्रीपदाचा निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचे अभिनंदन!
"नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मी अभिनंदन करतो. ते २७ व्या वर्षी महापौर झाले आणि ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. मी पुन्हा येईन असे म्हटल्यावर काही लोकांनी त्यांची टिंगल केली. पण ते पुन्हा आले. त्यामुळे मी त्यांचे पुन्हा अभिनंदन करतो. आमच्या महायुतीची एक नवी इनिंग सुरु झाली आहे. गेले अडीच वर्षे आम्ही टीम म्हणून काम केले. अडीच वर्षात मला देवेंद्रजी आणि अजितदादांनी खंबीर पाठिंबा दिला तसाच आता हा एकनाथ शिंदेसुद्धा देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल. आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत. विरोधक संख्याबळाने कमी असले तरी विरोधी पक्ष म्हणून आमचे महायुती सरकार त्यांना कमी लेखणार नाही. सरकार चुकत असल्यास विरोधी पक्षाने नक्की बोलावे. पण केवळ विरोधाला विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामात भाग घेतला पाहिजे. सारखा सभात्याग करुन लोकांना न्याय देता येणार नाही. त्यांनी अधिवेशनात भाग घ्यायला हवा. आम्ही अडीच वर्षे मंत्रीपद दिले असून आमच्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचे मुल्यमापन केले जाईल. जो काम करेल तो पुढे जाईल."
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
विरोधकांच्या प्रश्नांना व्यवस्थितपणे उत्तर देऊ!
"विरोधी पक्ष सातत्याने चहापानाचा कार्यक्रमावर बहिष्कार घालतात हा अलिकडे पायंडाच पडला आहे. हे वर्षानुवर्षे सुरुच आहे. त्यामुळे आता चहापान करावा की, नको हा एक विचार करणारा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ तारखेला प्रचंड बहुमताने महायूतीचे सरकार आले आणि आज मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन त्याला खऱ्या अर्थाने अंतिम स्वरुप प्राप्त झाले आहे. २ ते ३ दिवसात मुख्यमंत्री महोदय सर्वांचे खातेवाटप करतील आणि सगळे गतीने कामाला लागल्याचे पाहायला मिळेल. जनतेने महायुतीवर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यामध्ये कुठलीही अडचण येईल असे आम्हाला वाटत नाही. विरोधक संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असलेले प्रश्न चर्चेला आल्यास व्यवस्थितपणे त्याची उत्तरे दिली जातील. आम्हाला प्रचंड बहुमत असले तरी प्रचंड रेटून सभागृह चालवायचे, असे आमच्याकडून कदापि होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केली असून आमचेही त्याला समर्थन आहे. नेहमी विरोधकांचा मान ठेवून काम करायचे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, अशी बाब आमच्या सरकारकडून घडणार नाही."