चंद्राबाबू नायडूंकडून ‘स्वर्ण आंध्र २०४७’ची घोषणा

‘विकसित भारत २०४७’च्या धर्तीवर नव्या धोरणांची आखणी

    14-Dec-2024
Total Views | 50
Chandrababu Naidu

मुंबई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ( Chandrababu Naidu ) यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे ‘स्वर्ण आंध्र-२०४७’ हे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाच्या अंतर्गत “आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात रालोआ सरकार आंध्र प्रदेशच्या जनतेचा शाश्वत विकास साधताना, श्रीमंत, निरोगी आणि आनंदी आंध्र प्रदेशच्या निर्माणासाठी कार्य करणार आहे,” असेदेखील नायडू यांनी सांगितले.

देशाने नुकताच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. याचेच औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ सालापर्यंत म्हणजेच देश जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल, तोवर विकसित भारत साकार करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. मोदींच्याच पाऊलांवर पाऊल ठेवत, आंध्र प्रदेशचे सर्वांगीण विकासाचे धोरण ‘स्वर्ण आंध्र-२०४७’ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केले. ‘इंदिरा गांधी म्युनिसिपल स्टेडियम’मध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘स्वर्ण आंध्र -२०४७’चे अनावरण त्यांनी केले. या धोरणांतर्गत आंध्र प्रदेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी दहा तत्त्वे आणि एका समान दृष्टिकोन निश्चित करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे झालेल्या जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये नायडू यांनी “राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवरील सर्व कामकाज ‘स्वर्ण आंध्र-२०४७’नुसार चालेल,” असे जाहीर केले. तसेच “पुढील २३ वर्षांत नवीन धोरणातील सर्व उद्दिष्टे साध्य व्हावी, यासाठी आंध्र प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ‘स्वर्ण आंध्र-२०४७’ धोरण चर्चेसाठी सादर करण्यात आले. यावेळी २०४७ हा एक देशाच्या आणि राज्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. कारण, यावर्षी देश वसाहती राजवटीपासून भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल. गेल्या १०० वर्षांत आपण काय साध्य केले आहे, हे आपल्याला प्रत्येकाला अभिमानाने सांगावे लागेल,” असे नायडू यांनी म्हटले आहे. तसेच, “स्वर्ण आंध्र-२०४७’च्या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक मंडल पातळीवर परिषदा आणि आंध्र प्रदेशातील जवळपास १११.८ दशलक्ष कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जाणून घेतल्यानंतर तयार करण्यात आले,” अशी माहिती नायडू यांनी दिली. “त्यामुळे भविष्यात राज्यात कोणाचीही सत्ता आली तरी हे धोरण अपरिवर्तनीय राहील, त्यामुळे ‘स्वर्ण आंध्र’चे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल,” असा विश्वासही नायडू यांनी व्यक्त केला आहे.

‘स्वर्ण आंध्र-२०४७’च्या अंतर्गत आंध्र प्रदेशातून गरिबी उच्चाटन, रोजगारनिर्मिती, कौशल्य आणि मानव संसाधन विकास, जलसुरक्षा, कृषी तंत्रज्ञान विकास आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये देशाच्या योगदानात आंध्र प्रदेशचे योगदान वाढवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. तसेच, आंध्र प्रदेशातील स्वच्छतेसाठीही या धोरणात विशेष स्थान देण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121