दिग्दर्शकाला ‘चित्रपट दिसतो’ असे म्हणतात. पण, म्हणजे नेमके त्याला चित्रपट किंवा त्यातील प्रत्येक दृश्य व्हिज्युअली कसे दिसेल, ते समजणे म्हणजे नेमके काय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘झिरो से रिस्टार्ट’ हा चित्रपट. दिग्दर्शक विदु विनोद चोप्रा गेली ४५ वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. १९७६ सालापासून त्यांनी ‘शॉर्ट फिल्म्स’ने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू केला, तो आज २०२४ सालापर्यंत अविरत सुरू आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘१२वी फेल’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून तुफान प्रतिसाद मिळवला. देशभराच्या कानाकोपर्यातून आलेले विद्यार्थी जीव तोडून ‘युपीएससी’ परीक्षेची तयारी कशी करतात आणि त्यातील एक म्हणजे ‘आयपीएस’ मनोज कुमार शर्मा यांची सत्यकथा या चित्रपटातून दाखवण्यात आली होती. मात्र, ‘१२वी फेल’ हा चित्रपट नेमका कसा घडला, कोणत्या संकटांचा सामना करून या चित्रपटाने आज यश मिळवले, त्याची कथा ‘झिरो से रिस्टार्ट’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे त्याविषयी...
खरं तर, ‘झिरो से रिस्टार्ट’ या चित्रपटात ‘१२वी फेल’ या चित्रपटाच्या कथेची सुरुवात कुठून झाली आणि त्या संहितेचे किती ‘ड्राफ्ट’ तयार झाले आणि चार-पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ती कथा कशी मोठ्या पडद्यावर साकारली गेली, हे दाखवण्यात आले आहे. अलीकडच्या काळात म्हणायचे झाल्यास ‘१२वी फेल’ या चित्रपटाचा हा ’BTS’ (Behind The Scenes) आहे. मुळात ‘१२वी फेल’ हा चित्रपट तयार होणारच नाही, अशी मानसिकता पहिल्या दिवसापासून अनेकांची होती. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम राहात विदु विनोद चोप्रा यांनी लोकांसमोर ही सत्यकथा आणण्याचा निर्धार केलाच. या चित्रपटाची कथा जरी ठरली होती, तरी या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, हे अद्याप ठरले नव्हते. अनेक दिग्दर्शकांनी कथेत वजन नसल्यामुळे संहिता नाकारली होती आणि विदु चोप्रा यांच्या दिग्दर्शनाची शैली पाहता, त्यांच्या पठडीतील हा चित्रपटच नव्हता. पण, शेवटी दिग्दर्शकच मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव विदु विनोद चोप्रा यांनी ‘१२वी फेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे चित्रपटाचा प्रवास सुरू झाला.
यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, ‘दिग्दर्शकाला संपूर्ण चित्रपट दिसतो’ हे पठडीतील वाक्य म्हटले जाते. त्याचाच नेमका अर्थ अगदी सोप्या पद्धतीने ‘झिरो से रिस्टार्ट’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. म्हणजे, चित्रपटाच्या कथेला अनुसरून लोकेशन्सची रेकी कशी केली जाते, त्यासाठी किती आणि कशी शोधाशोध केली जाते, त्याशिवाय जर रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकाचा सेट उभा करायचा असेल, तर त्यासाठी ‘रिअल’ आणि ‘रिल लोकेशन्स’चे साधर्म्य कसे साधावे लागते आणि त्यासाठी दिग्दर्शक किती बारकाईने सगळ्याचा विचार करत असतो, हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ‘१२वी फेल’ या चित्रपटाचे चित्रिकरण चंबळच्या जंगलात, आग्रा, दिल्ली आणि मसुरीमध्ये करण्यात आले आहे. रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण करताना येणार्या अडचणी चित्रपटाचा संपूर्ण चमू कसा सामना करतो, हे सारे काही यातून अगदी जीवंत दिसते. एखादा चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला नाही, तर अगदी सहजपणे ‘काय वाईट चित्रपट आहे,’ हे वाक्य तोंडातून निघून जाते. पण, तो अडीच तासांचा चित्रपट तयार करण्यासाठी १०० हून अधिक लोक एक, दोन किंवा त्यांहून अधिक वर्षे किती झटत असतात, याचा प्रत्यय ‘याचि देही, याचि डोळा’ ‘झिरो से रिस्टार्ट’ हा चित्रपट देऊन जातो.
प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट दिग्दर्शनाची एक विशिष्ट पद्धत आणि शैली असते. बर्याचदा काही मुलाखतींमधून दिग्दर्शक “कागदावर चित्रपटाची संहिता आणि दृश्ये पक्की असतील, तर चित्रीकरण करण्यास सोपे जाते,” असे म्हणताना आपण ऐकलेही असेल. पण, ज्यावेळी चित्रीकरणास प्रारंभ होतो, तेव्हा त्याठिकाणी येणार्या अडचणींचा सामना करून दिग्दर्शक ती कलाकृती कशी यशस्वी करतो, हे या चित्रपटातून चोप्रा यांनी अगदी उत्तमरित्या पटवून दिले आहे. विदु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट म्हणजे ‘१९४२ : अ लव्ह स्टोरी’, ‘मिशन काश्मीर’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘परिंदा’, ‘एकलव्य’ आणि अशा अनेकविध विषयांवर आधारित चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात अॅक्शन, गोळीबार, मारामारी असतेच, पण ‘१२वी फेल’ या चित्रपटात शारीरिक नाही, तर फक्त वैचारिक आणि स्वतःच्या करिअरशी मनोज शर्मा यांनी केलेली वादावादी होती. त्यामुळे हे शिवधनुष्य चोप्रा दिग्दर्शक म्हणून पेलू शकतील का, अशी शंका बर्याचजणांना होती. परंतु, ती शंका नष्ट करून ‘१२वी फेल’ हा सुपरहिट चित्रपट विदु विनोद चोप्रा यांनी प्रेक्षकांच्या स्वाधीन केला. आणि हा चित्रपट यशस्वी कसा झाला, त्याची कथा ‘झीरो से रिस्टार्ट’मध्ये ज्यापद्धतीने दाखवण्यात आली आहे, ती अत्यंत प्रेरणादायी आहे.