पेण : रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेतील ( Urban Bank ) ८०० कोटींच्या घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालानुसार ईडीने बँकेवरील स्थगिती उठवली आहे. या निर्णयामुळे बँकेच्या १ लाख, ५८ हजार ठेवीदारांना हक्काचे ६११ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘पेण अर्बन बँक संघर्ष समिती’च्या २०१७ सालापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आहे आहे. पेण अर्बन बँकेतील मालमत्तेवर कथित घोटाळ्यानंतर ईडीने टाच आणली होती. या प्रकरणी २०१७ सालापासून ‘पेण बँक संघर्ष समिती’ने न्यायालयीन लढा पुकारला होता.
ठेवीदारांच्या हितासाठी संघर्ष समितीने न्यायाची भूमिका घेत सातत्याने मोर्चे, आंदोलने, उपोषण, रस्ता रोको केले. २०१२ साली धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात या प्रकरणी लॉग मार्च काढण्यात आला होता. त्यानंतर २०१५ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईतील आझाद मैदानात संघर्ष समितीने आंदोलन पुकारले होते. अलीकडेच सप्टेंबर २०२४ साली कर्जतमध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम आणि संघर्ष समितीचे मोहन, सुर्वे, प्रदीप शहा यांच्या नेतृत्वात दहा दिवस साखळी उपोषण केले होते. अखेर दि. २६ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने बँकेवरील स्थगिती उठवण्याचे निर्देश ईडीला दिले होते. त्याची अंमलबजावणी करताना दि. ३ डिसेंबर रोजी बँकेच्या मालमत्तेवरील स्थगिती उठल्याने ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, पेण अर्बन बँकेच्या मालमत्तेवरील ईडीची स्थगिती उठवण्यात आल्याने ठेवीदारांना योग्य न्याय मिळाला आहे. या आदेशामुळे ठेवीदारांनी हिताकरिता ठेवलेले पैसे व्याजासहित परत मिळतील, अशी आशा पल्लवित झाली आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून देर है पर अंधेर नही, अशी सर्वत्र चर्चा आहे.