मुंबई, दि.१० : म्हाडा कोकण मंडळाच्या २,२६४ घरांच्या सोडतीची अर्ज विक्री प्रक्रिया मंगळवारी संपुष्टात येत असून अर्ज विक्री-स्वीकृतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत २,२६४ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ ४९८९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेर अर्ज विक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार आता १० डिसेंबरऐवजी २५ डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
कोकण मंडळाकडून २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८, १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसह विखुरलेल्या ११७ घरे अशा एकूण २,२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज विक्रीची मुदत मंगळवारी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे.
सोमवार, दि.९ डिसेंबरपर्यंत २,२६४ घरांसाठी १३ हजार २४९ जणांनी अर्ज भरण्यात आले आहेत. तर यातील केवल ४,९८९ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. एकूण २,२६४ घरांसाठी केवळ ४९८९ अर्ज आले असून हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. त्यामुळे अखेर मंडळाने अर्ज विक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. या मुदतवाढीनुसार २५ डिसेंबरपर्यंत आता अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार असून यादरम्यान अर्जसंख्येत वाढ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.