महायुतीचा दबदबा; सात विधानसभा मतदारसंघांत ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात
08-Nov-2024
Total Views |
पेण : ( Raigad ) रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले. प्रचारासाठी केवळ १२ दिवस उरले असून विद्यमान सातही आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकेकाळी काँग्रेस आणि शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगडने मुख्यमंत्री अ. र. अंतुले (काँग्रेस) आणि विरोधी पक्ष नेते अॅड. दत्ता पाटील (शेकाप) हे दिग्गज नेते दिले. पण, आता रायगडमधून काँग्रेसचा ‘हात’ गायब झाला असून शेकापला अखेरची घरघर लागली आहे. मात्र, महायुतीचा दबदबा वाढला आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि उरण विधानसभा मतदारसंघावर माजी खा. रामशेठ ठाकूर यांचा पगडा आहे. भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रांतसरचिटणीस आ. विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. प्रशांत ठाकूर (पनवेल) आणि आ. महेश बालदी (उरण) हे पुन्हा विजयी होतील, यात शंकाच नाही.
पेण-पाली विधानसभा मतदारसंघ हा खा. सुनिल तटकरे (राष्ट्रवादी) आणि खा. धैर्यशील पाटील (भाजप) हे विद्यमान आ. रविशेठ पाटील यांना किती मताधिक्यांनी विजयी करणार, याकडे सार्यांचे लक्ष आहे.
श्रीवर्धन मतदारसंघात विद्यमान मंत्री आ. आदिती तटकरे यांच्यासमोर तुल्यबळ विरोधी उमेदवार नसल्याने त्या एकतर्फी निवडून येतील यात शंका नाही. महाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. भरतशेठ गोगावले (शिंदे शिवसेना) यांच्याविरोधात स्नेहल जगताप (उद्धव शिवसेना) यांच्यात सरळ लढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा कशाप्रकारे सर्वसामान्य मतदारांना फायदा झाला, किती महिलांनी या योजनांचा लाभ घेतला, याची माहिती देत महायुती मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. विधानसभेचे बिगुल वाजल्यापासून कर्जत विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय स्थित्यंतरे घडत आहेत.
महायुतीचे विद्यमान आ. महेंद्र थोरवे (शिंदे शिवसेना), अपक्ष उमेदवार सुधाकर घारे, नितीन सावंत यांच्यात प्रमुख लढत आहे. खा. श्रीरंग बारणे, (शिंदे शिवसेना) हे विजयश्री खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर भाजपच्या महिला आघाडी प्रमुख कल्पना दास्ताने, अॅड. राजेंद्र येरुणकर, सुनील गोगटे, विभावरी जोशी आदी कार्यकर्ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलिबाग मतदारसंघात विद्यमान आ. महेंद्र दळवी (शिंदे शिवसेना) यांच्याविरोधात चित्रलेखा पाटील (शेकाप) यांना महाविकास आघाडीने पाठींबा दिला आहे.
मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आमदार जयंत पाटील यांना विधानसभेत पराभव करून शेकापक्षाची रायगड जिल्ह्यातील सद्दी संपवली, तर आता विधानसभेत उद्धव शिवसेना शेकापला हद्दपार करतील, अशी शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंचा आदेश धुडकावत पेण आणि पनवेलमधील उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
विधानसभा निवडणुकीतील गृह मतदानाच्या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन सजग आहे.
- किसन जावळे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रायगड