मुंबई : ऑल इंडिया उलमा बोर्डकडून इंडी आघाडी आणि काँग्रेसला काही मागण्यांसदर्भात पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात विधानसभा निवडणूकीत पाठिंबा देण्याच्या बदल्यात १७ मागण्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना या मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासनही दिले आहे.
ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
१) मौलाना सलमान अजहरी हे तुरुंगात असून इंडिया आघाडीच्या ३१ खासदारांनी त्यांना सोडण्याची शिफारस करणारे पत्र मोदी सरकारला लिहावे.
२) महाराष्ट्रात मशिदीचे इमाम, मोअजनला सरकारतर्फे दर महिन्याला १५ हजार रुपये देण्यात यावे.
३) महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील शिक्षित मुलांना पोलिस भरतीत प्राधान्य देण्यात यावे.
४) रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना तुरुंगात टाकण्यासाठी इंडी आघाडीने आंदोलन करावे.
५) ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना, आलीम हाफीज मस्जिदचे इमाम यांना महाराष्ट्रात इंडी आघाडीचे सरकार आल्यावर शासकीय कमिटीमध्ये घेण्यात यावे.
६) महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत मुस्लीम समाजातील ५० उमेदवारांना तिकीट देण्यात यावे.
७) महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डमध्ये शासनातर्फे ५०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी.
८) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी विधानसभेत ठराव करून कायदा करण्यात यावा.
दरम्यान, नाना पटोलेंनी विधानसभा निवडणूकीत ऑल इंडिया उलमा बोर्डने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचार करण्याची विनंती केली. तसेच महाराष्ट्रात इंडी आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या मागण्याच्या अंमलबजावणीसंदर्भात पावले उचलण्याचे आश्वासनही दिले.