"तुम्ही मर्दाची औलाद होता, तर...", मुंब्र्यातील जाहीर सभेत जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक विधान!
03-Nov-2024
Total Views | 27
मुंबई : ( Jitendra Awhad on Ajit Pawar) ठाण्यातील चंदननगर मुंब्रा येथे आयोजित एका जाहीर सभेला संबोधित करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान बोलत असताना अजित पवार गट हा पाकिटमारांची टोळी आहे, असे आव्हाड म्हणाले. तसेच अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर स्वतःचा वेगळा पक्ष काढून नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असे म्हणत अजित पवारांवर हल्लाबोल केला.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड ह्यांनी मुंब्रा येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत अजित पवारांवर जोरदार टीका केली. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा होता. पण एके दिवशी अजित पवार येतात आणि धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढतात. जाताना त्यांच्याकडील घड्याळ देखील हिसकावून नेतात. अजित पवार गट ही पाकीटमारांची टोळी आहे", असे म्हणत आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
अजित पवारांना उद्देशून बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वतःचे वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजले असते. ज्या काकांनी देशभरात स्वतःचा पक्ष पसरवला आणि वाढवला. त्या पक्षाला तुम्ही माझं माझं म्हणत हिसकावून घेतले आहे. परंतु जनतेला सगळं सत्य ठाऊक आहे", असेही ते म्हणाले.