1991 साली खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर सर्वार्थाने भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली. त्याचे सकारात्मक परिणाम उद्योगधंद्यांबरोबरच मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीवरही हळूहळू उमटू लागले. त्यातच 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अर्थव्यवस्थेने घेतलेली भरारी ही तर सर्वस्वी थक्क करणारी. वाढते उद्योगधंदे, शेअर बाजारातील गुंतवणूक, चांगल्या पगारांच्या नोकर्यांमुळे मध्यमवर्गीयांची क्रयशक्तीही वाढली. परिणामी, आजकालच्या तरुणाईचा आणि मध्यमवर्गीयांचा कल हा आलिशान जीवनशैलीकडे झुकलेला दिसून येतो. तेव्हा, अर्थव्यवस्थेतील आणि बाजारपेठेतील या स्थित्यंतरांचा आढावा घेणारा हा लेख...
रतात शहरीकरण झपाट्याने होत असल्यामुळे भारतीयांना आता ‘लक्झरी’ जीवन जगण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्या आपला देश हा मोठा आर्थिक बदल अनुभवत आहे. 1990-95 सालापर्यंत मध्यमवर्गीयांचे जीवन व आजच्या मध्यमवर्गीय व श्रीमंतांचे जीवन यात बराचसा बदलही झाला आहे. लक्झरी कार, हाय-एंड अपार्टमेंट, वर्षाकाठी एक-दोन परदेशवार्या परदेशी बनावटीची घड्याळे, क्लब मेंबरशीप, महागड्या शाळा व क्लासेस अशा अनेक गोष्टी ज्या काही वर्षांपूर्वी ‘जरुरी’ वाटत नव्हत्या, त्या आता काहीजणांच्या ‘गरजा’ झाल्या आहेत. असा हा मोठा आर्थिक बदल या देशात घडलेला दिसतो.
भारतीय ग्राहक कायम किमतीबाबत संवेदनशील म्हणून ओळखले जायचे. स्वतःच्या खिशाला परवडतील अशाच वस्तू विकत घेण्याकडे पूर्वी कल होता. मात्र, आता ‘शो-ऑफ’ म्हणून मध्यमवर्ग वस्तूंच्या वापरमूल्यापेक्षा त्यांच्या दिखाऊ मूल्याला अधिक महत्त्व देत असल्याचेही अलीकडे दिसून आले. या बदलामागे प्रमुख कारण म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल व्यवहारांत झालेली वाढ.
अतिश्रीमंतांची वाढली संख्या
देशातील अतिश्रीमंतांची संख्या 2023 मध्ये त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 6.1 टक्के अधिक नोंदवली गेली व ती 13 हजार, 262 व्यक्तींवर पोहोचली. जागतिक सल्लागार ‘नाईट फ्रँक’च्या संपत्ती अहवाल 2024 नुसार, अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या (तीन कोटी डॉलर्सपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असणारे) 2023 मधील 13 हजार, 262 वरून 2028 पर्यंत 19 हजार, 908 पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
ई-कॉमर्स
‘कोरोना’ महामारीच्या काळानंतर डिजिटल अर्थव्यवस्थेचा मोठा विस्तार झाला. त्यामुळे शहरांबरोबरच दुसर्या व तिसर्या क्रमांकाच्या शहरांतील ग्राहकदेखील लक्झरी वस्तूंकडे आकर्षित होऊ लागले. यापूर्वी मॉल व लक्झरी वस्तूंच्या दालनांमध्ये फक्त शहरी उच्चभ्रूच जात होते. पण, हल्ली मध्यमवर्गीयही सर्रास अशा मॉलमध्ये फेरफटका मारण्याबरोबरच खरेदी करतानाही दिसतात.
क्रेडिट कार्ड
लक्झरी वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी भारतीयांना प्रवृत्त करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे क्रेडिट कार्डचा वाढता वापर. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतात क्रेडिट कार्डने केलेल्या खर्चामध्ये मार्च 2021 पासून 2024 पर्यंत तिप्पट वाढ होऊन हा आकडा 18.31 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सध्या देशात दहा कोटींच्यावर क्रेडिट कार्ड वापरात आहेत.
‘कोरोना’ महामारीचा परिणाम
‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे मौजमजा न करता आल्यामुळे व जीवन किती क्षणभंगूर आहे, याचीही जाणीव झाल्यामुळे मध्यमवर्गीयांचाही आपले आयुष्य मनसोक्त जगण्याकडे कल वाढलेला दिसतो. म्हणूनच घरात बसलेल्या कुटुंबीयांनी पर्यटन, परदेशगमन, हॉटेलिंग यावर खर्च वाढविला.
शेअर बाजारातील वाढती गुंतवणूक
गेल्या दहा वर्षांत सरकारच्या विविध आर्थिक धोरणांमुळे उद्योगांची भरभराट झाली. त्याचे प्रतिबिंब ‘सेन्सेक्स’ व ‘निफ्टी’ या प्रमुख शेअर निर्देशांकात दिसते. हे निर्देशांक गेल्या दहा वर्षांत साधारण 250 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे श्रीमंत गुंतवणूकदार अधिक श्रीमंत झाले आहेत. पारंपरिकतेने सोन्यात गुंतवणूक करणारी जनता आता आलिशान फ्लॅट, वाहने, पर्यटन, हॉटेलिंग यांवर खर्च करू लागली आहे. ग्राहकांचा आलिशान वस्तूंकडे झुकलेला कल पाहून बर्याच उत्पादकांनी कमी किमतींची उत्पादने उत्पादित करण्याचे प्रमाण कमी केले असून, जास्त किमतीच्या ऐषोरामी वस्तूंचे उत्पादन व विक्री यांवर जोर द्यायला सुरुवात केली आहे. ‘फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ (एफएमसीजी) क्षेत्रात सर्वात मोठ्या ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक युनिलिव्हरने ‘लॉन्च’ केलेल्या नव्या उत्पादनांपैकी 70 टक्के उत्पादने महागडी आहेत. ‘आयटीसी’ कंपनी वैयक्तिक काळजी विभागातील 65 टक्के उत्पादने महागडी उत्पादित करते. गेल्या चार वर्षांत या उत्पादनांच्या विक्रीत 38 टक्के वाढ झाली आहे. ‘मॉन्जिनिस’ केक मागे पडून ‘थिओब्रोमा’च्या केकची मागणी वाढली आहे. ‘पार्ले’ ही 60 ते 65 टक्के बिस्कीटे जास्त किमतींची उत्पादित करीत आहे. स्मार्टफोन व टीव्हीबाबतही कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती दिसून येते. यावरून सिद्ध होते की, भारतीय अर्थव्यवस्था बदलली असून, भारतीयांचा कल महागड्या वस्तू घेण्याकडे झुकला आहे.
वाहननिर्मिती उद्योगालाही सुगीचे दिवस
वाहननिर्मिती क्षेत्रात भारतात 2018 मध्ये दहा लाखांहून जास्त किमतींच्या गाड्यांचे प्रमाण 18 टक्के होते. ते आता 45 टक्क्यांवर पोहोचले आहे. ‘मारुती सुझुकी’ वगळता दुसर्या कुठल्याही कंपनीची पाच लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची गाडी आज बाजारात दिसत नाही. ‘स्कोडा ऑटो’, ‘फोक्सवॅगन’, ‘टोयोटा’, ‘होंडा’, ‘महिंद्रा आणि महिंद्रा’ हे मोठे ऑटोमोबाईल समूह यापुढे भारतात कमी किमतींच्या लहान गाड्या विकणार नाहीत, असेच म्हणता येईल. उच्च शक्तीच्या बाईक, इलेक्ट्रिक वाहने आणि स्कूटरची मागणी देशात वाढते आहे. देशांतर्गत लक्झरी कार श्रेणीमध्ये भारतात 2023 मध्ये विक्रीत 28 टक्क्यांची वाढ झाली. या श्रेणीतील सुमारे 48 हजार, 500 कार विकल्या गेल्या. भारतात आता ‘लो मार्केट’ ही संकल्पना मागे पडत असून ‘हाय मार्केट’ ही संकल्पना प्रबळ होत चालली आहे, याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.
महल हो सपनों का...
गृहनिर्माण क्षेत्रात कमीतकमी दोन बीएचके किंवा त्याहून अधिक आकाराच्या घरांची मागणी देशात वाढली आहे. अंतर्गत सजावटीसाठी ‘फिलिप्स’चे दिवे किंवा ‘कजारिया’, ‘जॅक्वार’च्या सेंटरला भेट दिली जाते. आरोग्य सेवेत जनऔषधींच्या वाढत्या प्रभावामुळे, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले लक्ष अधिक चांगले उत्पादन देणार्या ब्रॅण्डेड उत्पादन पोर्टफोलिओ मजबूत करण्यावर दिले आहे. रुग्णालय सेवेत मोठे बदल होत आहेत. साधारण आजारांसाठीदेखील मोठ्या सुसज्ज, महागड्या रुग्णालयामध्ये जायची लोकांची तयारी असते. हा व्यवसाय जो धर्मादाय संस्था किंवा सरकारी खात्यामार्फत चालायचा, त्यात आता मोठ्या कंपन्या उतरल्या आहेत.
अल्ट्रा-प्रीमियम शॉपिंग मॉलची वाढ हादेखील लक्झरी जीवनात झालेल्या वाढीचा परिणाम आहे. खरेदीसाठी साधारण दुकानांमध्ये न जाता, श्रीमंत अनुभूती देणार्या अल्ट्रा-प्रीमियम शॉपिंग मॉलमध्ये जाण्याची ग्राहकांना गरज भासू लागली आहे. यामुळे गेल्या नोव्हेंबरमध्ये मुकेश अंबानी यांनी मुंबईत देशातील सर्वात मोठे लक्झरी शॉपिंग सेंटर ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ सुरू केले.
विकसनशील देश म्हणून ओळखला जाणारा भारत गेल्या 15 वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी अतिशय वेगाने प्रगती करीत आहे. लक्झरी जीवनासाठी खालील नमूद केलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक वाढलेली आगामी काळात दिसू शकते. त्या कंपन्या म्हणजे-1) टाटा समूहाची ‘टायटन’, जी अगोदर फक्त घड्याळांचे उत्पादन करीत असे, आता फॅशनेबेल ज्वेलरी व उंची साड्याही विकते. 2) पिडीलाईट इंडस्ट्रीज-सुरुवातीला फेव्हिकॉल उत्पादित करणारी ही कंपनी नंतर ‘फेव्हिस्टीक’ व ‘फेविक्विक’ ही उत्पादित करू लागली. 3) पेज इंडस्ट्रीज-रुपा व लक्स वापरणार्यांना ‘जॉकी’ उपलब्ध करून देणारी कंपनी. 4) टाटा कन्झ्युमर कंपनी-देश का नमक टाटा नमक, रॉक सॉल्ट, टेरले, हर्बल टी बॅग्ज, स्टारबक उत्पादित करणारी कंपनी 5) वेदांता फॅशन्स-भारतात ‘एथनिक’ कपडे उत्पादित करणारी कंपनी 6) मेट्रो ब्रँड-उच्च दर्जाचे बुट उत्पादित करणारी कंपनी 7) एफएमसीजी उत्पादनांतील ‘नेस्ले’, ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’, ‘मॅनकाईंड फार्मा’ या कंपन्या 8) पर्यटन क्षेत्रतील ‘महिंद्रा हॉलिडेज’ 9) आरोग्य क्षेत्रातील ‘डॉ. पॅथ लॅब’, ‘रेन्बो चिल्ड्रन हॉस्पिटल’ 10) वाहन क्षेत्रातील ‘टाटा मोटर्स’, ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’, ‘ह्युंदाई’.
शशांक गुळगुळे