सुहास कांदे VS समीर भुजबळ राडा! वाचा संपूर्ण प्रकरण
20-Nov-2024
Total Views |
नाशिक : (Nashik) विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानप्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. याचदरम्यान नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो मतदारांना आणून पैसे वाटप केल्याचा आरोप समीर भुजबळांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आले. कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले व त्यांना "आज तुझा मर्डर फिक्स आहे", असे म्हणत थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे.
नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा सगळा प्रकार घडला. याठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांची गुरुकुल शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेच्या बाहेरच प्रसारमाध्यमे व पोलीसांसमोर कांदे व भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेनंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच समीर भुजबळ यांनी प्रत्यक्षात काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.
काय म्हणाले समीर भुजबळ?
समीर भुजबळ म्हणाले, “मी रस्त्याने जात होतो. तिथे मला काही बसेस, टेम्पो, ट्रक उभे असलेले दिसले. मी ते पाहण्यासाठी आत गेलो. तिथे स्थानिक आमदाराची शाळा आहे. तिथे हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आलं होतं. ते सगळं पाहून मी पोलिसांना फोन केला. निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार केली. मी त्यांना सांगितलं की तिथे हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आलं आहे. पैसे वाटण्याचे काम चालू होतं, लोकांना जेवण दिलं जातं होतं, खानावळी चालू होत्या, हे सगळं पोलिसांना कळायला हवं होतं. मात्र, त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही. तेवढ्यात आमदार महाशय तिथे आले आणि ते थेट माझ्या अंगावर धावून आले. मला जीवे मारण्याची धमकी देत होते, त्यांनी मला शिवीगाळही केली. पोलीस मात्र हे सगळं निमूटपणे बघत बसले होते. त्यांच्याबरोबर (आमदार) आलेले गुंड जे तडीपार आहेत ते मला मारायचा प्रयत्न करत होते. मी त्यांची नावं पोलिसांना दिली आहेत. परंतु, पोलिसांनी अद्याप त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही.पोलीसच गुन्हेगारांना पळवून लावत होते. आमदाराच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ केली, मला मारायची धमकी दिली आणि पोलीस मात्र हे सगळं बघत बसले होते. माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. शिवीगाळ होत आहे. आज पत्रकारांसमोर मला शिवीगाळ केली. मला मारण्याची धमकी दिली. ‘आज तुझा मर्डर होणार’, ‘तुझा मर्डर फिक्स आहे’, असे शब्द आमदाराने वापरले. ‘मी तुझा मर्डर करणार’ असं बोलून ते मला धमक्या देत होते. पोलीस मात्र निमूटपणे बघत होते”.
प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल
समीर भुजबळ आणि सुहास कांदेंमध्ये झालेल्या प्रकरणाची दखल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आहे. दोन्ही उमेदवारांना समजवण्यात निवडणूक अधिकाऱ्यांना यश आलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नाशिक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी निवडणूक प्रक्रिया अंतर्गत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मतदारांचा संताप
काही काळ समीर भुजबळानी यांना अडवून ठेवलेल्या मतदारांनी “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो…आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असे म्हणत संताप व्यक्त केला.