केजरीवालांना दणका...

    19-Nov-2024
Total Views |

GEHLOT
 
पुढील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्याआधीच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आतिषी सरकारमध्ये मंत्री असलेल्या कैलाश गहलोत यांनी मंत्रिपदासह आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. केजरीवाल यांनी जनतेला धोका दिला असून, शीशमहल घोटाळा केल्याचा आरोपही गहलोत यांनी केला आहे. मंत्री असूनही गहलोत यांनी पक्षासहित पदाला सोडचिठ्ठी दिल्याने आश्वर्य व्यक्त केले जात आहे. गहलोत यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला असून, एकेकाळी त्यांना अरविंद केजरीवालांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जात होते. आतिषी यांना मुख्यमंत्रिपदी संधी दिल्यानंतर ‘आप’मध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. अनेक दिग्गज नेते पक्षात असतानाही केजरीवाल यांनी आतिषी यांना मुख्यमंत्री बनविल्याने अनेक नेते नाराज होते. गहलोत २०१५ साली ‘आप’च्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. केजरीवाल यांचे सल्लागार म्हणूनही त्यांना ओळखले जाऊ लागले. सिसोदिया तुरूंगात गेल्यानंतर गहलोत यांनीच दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, संधी आतिषी यांना मिळाली. मद्य घोटाळा, शीशमहल घोटाळा यांमुळे केजरीवाल अडचणीत आले आहे. त्यातच आता कैलाश यांनी सोडचिठ्ठी दिल्याने ‘आप’च्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिमा सुधारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी मुख्यमंत्री पद सोडण्याचे नाटकही केजरीवाल यांनी केले. मात्र, तरीही केजरीवाल यांनी आपल्या चुका तुरूंगात असताना ज्याने झाकल्या त्यालाच प्राधान्य दिले. ‘आप’ सरकारचे मंत्री केजरीवालांच्या हुकूमशाहीला वैतागले आहेत. केजरीवाल यांनी राजकारणात येताना ‘मी सरकारी वाहन, बंगला घेणार नाही, सरकारी सुविधांचा त्याग करणार’ असे वचन दिल्लीकरांना दिले होते. मात्र, त्यापैकी एकही कृती त्यांनी प्रत्यक्षात आणली नाही. उलट आहे ते सरकारी निवासस्थान अधिक सुविधायुक्त करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. जी काही वचने दिल्लीकरांच्या माथी मारली ती सगळी मोडून काढत आपल्या मनमर्जीने एकप्रकारे हुकूमशाहीचे प्रणेते केजरीवाल होऊन बसले. गहलोत यांच्यामुळे केजरीवालांची भ्रष्ट कार्यपद्धतीची झलक पुन्हा एकदा दिल्लीसह देशासमोर आली.
 
 
नौटंकीचा पुढचा अंक
 
 
राहुल गांधी यांनी जेमतेम सभा घेत महाविकास आघाडीचा प्रचार केला. मात्र, तो प्रचार कमी आणि नौटंकी जास्त ठरली. संविधानाची प्रत हातात घेऊन आरक्षणाचे आम्हीच रक्षणकर्ते असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, परदेशात जाऊन आरक्षण बंद करण्याच्या त्यांच्या वक्तव्यांचा त्यांना विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित राहतो. आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला, ज्याला देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार करताना ‘एक हैं, तो सेफ हैं’ असा नारा दिला. ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. महाराष्ट्रच नाही, तर देशभरातील विरोधकांचा या घोषणेमुळे पोटशूळ उठला. दरवेळी पंतप्रधान आधी जे करतात, त्यावर विरोधक आपली भूमिका आणि राजकारण ठरवत असतात. ‘मैं भी चौकीदार हूँ’, ‘सबका साथ, सबका विकास’ अशा अनेक घोषणा आहेत, ज्या पंतप्रधान मोदींनी दिल्यानंतर विरोधकांनीच त्या उचलून धरत आपल्या राजकारणाला गती देण्याचे काम केले आणि आताही तोच कित्ता विरोधकांकडून गिरवला जात आहे. राहुल गांधी यांनी संविधान धोक्यात आल्याचे सांगत जनतेला भ्रमित केल्याचे सांगितले खरे, मात्र काँग्रेसनेच संविधानाची कशी मोडतोड केली, हे जनतेला सांगितले नाही. नुकतीच राहुल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या ‘एक हैं तो सेफ हैं’ या नार्‍याला प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. यातही त्यांनी नाटकाचे अंक रचण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत त्यांनी एक तिजोरी ठेवली होती. त्या तिजोरीवर ‘एक हैं तो सेफ हैं’ असे लिहिलेले होते. म्हणजे राहुल गांधी यांनीही या नार्‍याला दुजोरा दिला. तिजोरी उघडण्याची नौटंकी करून त्यातून त्यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे बाहेर काढली आणि धारावी अदानीला देणार असल्याचा तोच तोच कित्ता गिरवला. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचेही अदानी यांच्यासोबत फोटो आहे. मात्र, त्याकडे राहुल डोळेझाक करतात. अशीच डोळेझाक त्यांनी लोकसभेमध्ये डोळे मारून करून दाखवली आहेच. खुद्द शरद पवारांचे नातू अदानी यांना गाडी चालवत आपल्या घरी भेटीसाठी नेतात. यावरही राहुल मूग गिळून बसतात. म्हणून ही तिजोरीही नौटंकीचाच आणखी एक प्रकार म्हणावा लागेल.
 
 
पवन बोरस्ते