नालासोपारा, विरार स्वावलंबी शहर व्हायला हवे : राजन नाईक
15-Nov-2024
Total Views |
खानिवडे : “आज २१व्या शतकात भारताचा महासत्ता म्हणून उदय होत आहे. नालासोपारा, विरार-वसई हे या महासत्तेतील महानगर आहे. अलीकडे विकसित होत असलेल्या या ऐतिहासिक शहरातील स्वतःच्या घरकुलाबाबत अपेक्षा केवळ टोलेजंग इमारती आणि रस्ते नव्हेत किंवा केवळ रात्री पाठ टेकण्यापुरती जागा असेही नाही. मुलांचे शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, वाहतूक खेळासाठी क्रीडांगण-मैदाने, ज्येष्ठांसाठी विरंगुळा, रोजगार अशा दैनंदिन व सांस्कृतिक गरजा याच शहरात पूर्ण व्हायला हव्या. केवळ मुंबईसाठी काम करणार्या लोकांची वसाहत नको, तर एक स्वावलंबी शहर हवे,” असा संकल्प नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजन नाईक ( Rajan Naik ) यांनी केला आहे. महायुतीच्या निवडणूकपूर्व संकल्पपत्राचे प्रकाशन गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी भाजप कार्यालय येथे झाले. या संकल्पपत्रातून नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठीच्या आवश्यक सोयी-सुविधांबाबतची माहिती देण्यात आली आहे.
“वसई-विरार शहरवासीयांसाठीच्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध असेन. या बहुमोल कार्यासाठी आपण सर्वांनी एक सजग नागरिक म्हणून वाटा उचलायला हवा,” अशी अपेक्षा राजन नाईक यांनी व्यक्त केली.
यावेळी महायुतीचे उमेदवार राजन नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते जोगेंद्र प्रसाद चौबे, राजेंद्र सिंह ठाकुर, महामंत्री जे. पी. सिंह, मनोज बारोट, अॅड. प्रदीप पांडे, राजीव रतन मिश्रा, प्रद्युम्न शुक्ला, चंद्रप्रकाश मिश्रा शिवसेना तालुकाप्रमुख सुदेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजाराम मुळीक, महामंत्री बेर्डे, रिपाईंचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे, जनता दल सेक्युलर जिल्हाध्यक्ष सतीश वारेकर, श्रमजीवीचे जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.