मालेगावातील १२ युवकांची बनावट खाती! कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार
किरीट सोमय्या : वोट जिहादसाठी पैशांचा वापर
15-Nov-2024
Total Views |
मुंबई : मालेगावमधील १२ तरुणांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यातून कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. मालेगावमध्ये २०० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला असून त्यातील सव्वाशे कोटींचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आल्याचे त्यांनी याआधी उघड केले होते. त्यानंतर शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, "मालेगाव वोट जिहाद फंडिंग घोटाळ्यात सिराज अहमद हारून मेमन आणि मोईन खानने १२ तरुणांची फसवणूक केली आहे. या घोटाळ्यात मालेगावमधील २० ते २१ वयोगटातील १२ हिंदू तरुणांना नोकरीचे आमिष दिले. तसेच त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडण्यात आली. त्यानंतर काही दिवसात त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. एवढंच नाही तर या युवकांच्या नावाने सिमकार्डदेखील घेण्यात आले."
"सिराज आणि त्याच्या साथीदारांनी बनावट सह्या करून हा व्यवहार केला. या प्रकरणातील एक युवक बँकेत गेल्यानंतर त्याच्या खात्यात एवढे पैसे आल्याचे त्याला कळले. त्यानंतर इतरांनी आपापली खाती तपासल्यानंतर त्यांच्या खात्यातही हे पैसे आल्याचे त्यांच्या लक्षात आले. ७ नोव्हेंबर रोजी सिराज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर कारवाई सुरु आहे. एकूण २०० कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा आहे. पहिल्या फेरीत फक्त नाशिक मर्चंट बँकेत खाती उघडण्यात आली. त्यानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्र मालेगावमध्येदेखील त्यांच्या नावाने खाती उघडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या युवकांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एकही सही केलेली नाही. तरीसुद्धा तिथे ४० कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचे बँक मॅनेजरने कबुल केले आहे. तर नाशिक मर्चंट बँकेत सव्वाशे कोटींचा व्यवहार झाला आहे. तपासादरम्यान, नाशिक मर्चंट बँकेत आणखी दोन खाती उघडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "मराठी मुस्लीम सेवा संघ आणि उलेमा बोर्डाच्या काही लोकांकडे हे पैसे गेले आहेत. नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे हे सगळे उलेमा बोर्डाच्या लोकांना भेटले आहेत. महाविकास आघाडीने या दोन्ही संस्थांना मान्यता दिली आणि त्यांच्या मागण्याही मान्य केल्या. याचा अर्थ या दोन्ही संस्था राहुल गांधींच्या काँग्रेसने तयार केल्या आहेत. सिराजने यात एकाही मुस्लीम मुलाला समाविष्ट केले नाही. त्यामुळे वोट जिहाद फंडिंगसाठी मोठी यंत्रणा काम करत असल्याचा मला विश्वास आहे," असेही किरीट सोमय्या म्हणाले.