काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन जनतेला लुबाडले : खासदार अनुराग ठाकूर
भाजपकडून ‘मविआ’च्या फसव्या घोषणांची पोलखोल
13-Nov-2024
Total Views |
1
मुंबई : कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजप नेत्यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत काँग्रेसची पोलखोल केली आहे. खासदार अनुराग ठाकूर ( Anurag Thakur ), केंद्रीय मंत्री डी. किशन रेड्डी आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला. निवडणुकीच्या आधी कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिलेली अनेक आश्वासने फोल ठरल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रेम शुक्ला आणि अतुल शाह उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. अनुराग ठाकूर म्हणाले की, “महायुतीचे घोषणापत्र हे देशाला एका नवीन उंचीवर नेणारे आहे. परंतु, देशातील अन्य राज्यांमध्ये निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने अनेक खोटी आश्वासने दिली आणि जनतेला लुबाडण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीवेळीसुद्धा काँग्रेसने संविधान बदलणार, असा खोटा प्रचार केला. मात्र, दुसरीकडे, राहुल गांधीकडे असलेल्या लाल संविधानाचे पुस्तक आतून कोरेच आहे. हे कोर्या पानाचे संविधान पुस्तक वाटण्यामागे काँग्रेसचा मोठा डाव आहे. काँग्रेसने संविधान लिहिणार्या बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करून राजकारणातून बाहेर केले.”
“काँग्रेसने हिमाचल प्रदेशात दहा गॅरंटी दिल्या होत्या. साधारण, दोन रुपये किलोप्रमाणे शेण आणि १०० रुपये लीटरप्रमाणे दूध खरेदी करणार. तसेच महिलांना प्रतिमहा १ हजार, ५०० रुपये देणार, अशी आश्वासने दिली होती. परंतु, दोन वर्षे होऊनही यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ३०० युनिट मोफत वीज देण्याचेही आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाहीच. शिवाय भाजपकडून मिळत असलेली १२५ युनिट मोफत वीजही बंद केली. युवकांना पाच लाख नोकर्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परंतु, पाच हजार नोकर्यासुद्धा देऊ शकले नाहीत. प्रत्येक गावात मोबाईल क्लिनीक देऊ, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनाच उपचारासाठी बाहेरगावी जावे लागते. काँग्रेसने खोटी आश्वासने दिली, त्यामुळे आता ते तोंडावर पडले आहेत. महाराष्ट्रात महावसुली आघाडी असून ती महाविनाश आघाडीच्या रुपात काम करते. आमच्या राज्यांमध्ये काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन काँग्रेस सत्तेत आली आणि सरकार आल्यानंतर लोकांची फसवणूक केली,” असे त्यांनी सांगितले.
कर्नाटक व तेलंगण राज्य काँग्रेससाठी ‘एटीएम’!
तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी महाराष्ट्रात येऊन खोटा प्रचार केला. तेलंगणमध्ये काँग्रेसचे सरकार येऊन ३४० दिवस झाले. पण, या दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केले नाहीत. काँग्रेसने जनतेला सहा गॅरंटी दिल्या. यासोबतच ४२० सब गॅरंटीसुद्धा दिल्या. या गॅरंटी देऊन सर्व वर्गातील लोकांची मते घेतली आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. कर्नाटक आणि तेलंगण हे दोन्ही राज्य काँग्रेससाठी ‘एटीएम’ बनले आहेत. तेलंगणमध्ये आज काँग्रेस सरकार राहुल गांधी आणि रेवंथ रेड्डी हे ‘आर आर’ टॅक्स धोरण राबवत आहे. ते उद्योग, रिअल इस्टेट कंपनी, उत्पादन युनिट, सरकारी जमिनी या सगळ्या क्षेत्रातील लोकांची आपल्या पदाचा गैरवापर करून लूट करतात. तेलंगणमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर देशात जेवढ्या निवडणुका झाल्या, त्या सगळ्याच निवडणुकींमध्ये तेलंगण काँग्रेस सरकारच्या ‘एटीएम’मधून पैसे आणत राहुल गांधी खर्च करत आहेत. हा तेलंगणतील जनतेच्या कष्टाचा पैसा आहे.
किशन रेड्डी, केंद्रीय मंत्री
कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकही आश्वासन पूर्ण केले नाही
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की, “काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांची गाडी कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलगंण अशी फिरून आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. निवडणुकीच्या १८ महिन्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकमध्ये येऊन जितके पैसे असतील तेवढीच आश्वासने द्या, असे आपल्या भाषणात सांगतात. तर, १८ महिन्यांच्या आधी कर्नाटकमध्ये काँग्रेसने पाच गॅरंटी दिल्या आणि राज्य बुडवले. २०२२ साली कर्नाटक सरकारवर ४६ हजार कोटी रुपये कर्ज होते. मात्र, आता १८ महिन्यांत हे कर्ज ८२ हजार कोटी रुपये झाले आहे. महिलांना बसमध्ये मोफत प्रवास देण्याची काँग्रेसने गॅरंटी दिली होती. त्यामुळे कर्नाटकमधील संपूर्ण रस्ते वाहतूक महामंडळ तोट्यात आले. बसमध्ये डिझेल टाकण्यासाठी, चालक वाहकांना पगार देण्यासाठीही आता पैसे शिल्लक नाहीत. महाराष्ट्रातही आता तीच खोटी आश्वासने देण्यात येत आहे,” असे त्यांनी सांगितले. ‘वक्फ बोर्ड’ संदर्भात बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, “काँग्रेसने जमीर अहमद खान नावाच्या मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यात पाठवले. तिथे जाऊन ते उपायुक्तांना धमकी देऊन शेतकर्यांच्या जमिनींवर ‘वक्फचा बोर्ड’ लावतात. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात हजारों एकर जमिनी ‘वक्फ बोर्ड’ला दिल्या. गावेच्या गावे वक्फला दिली आहेत,” अशी पोलखोलही शोभा करंदलाजे यांनी केली आहे.