मी लढणार आणि जिंकणार!

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी यांना विश्वास

    10-Nov-2024
Total Views |
Shayana NC

मुंबई : “मी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून चांगला लढा देणार आणि जिंकणार,” असा विश्वास येथील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार शायना एनसी ( Shayana NC ) यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्यावर उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या अभद्र टिपणीचाही त्यांनी समाचार घेतला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ ने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.

मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई हे नाव पडले आणि या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. यावेळी मुंबादेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार का?

आई मुंबादेवीचा आशीर्वाद नक्कीच आहे. महिलांचाही आशीर्वाद आहे. मुंबादेवीमध्ये कुठलीच प्रगती झालेली नाही. १५ वर्षांचा रिपोर्ट पाहिल्यास एकही गोष्ट सांगण्यासारखी नाही. दवाखाने, शाळा, पुनर्विकास यातले काहीच झालेले नाही. कामाठीपुरासारख्या परिसरात एक ब्लू प्रिंटसुद्धा दिली नाही. इथल्या आमदार आणि खासदारांना विचारल्यास आपण निवडणुकीनंतर सादर करू, असे ते सांगतात. फक्त तुष्टीकरणाचे राजकारण एवढाच त्यांचा विचार आहे.

जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास हा सध्या येथे कळीचा मुद्दा आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कसा पाठपुरावा करणार?

कुंभारवाडा, उमरखाडी, कामाठीपुरा, बीआयटी चाळ यापैकी कुठलेच पुनर्वसन झालेले नाही. राजकीय इच्छाशक्ती कुठे आहे? आमदार आणि खासदार तुमची मते घेऊन १५ वर्षे राज्य करतात. परंतु, ते तुमच्यासाठी आवाज उठवणार नाहीत आणि तुमची कामेच करणार नाहीत, तर त्यांचा उपयोग काय? कितीतरी इमारतींवर एकावर एक अनधिकृत बांधकाम आहे. ते केवळ त्यांच्या व्होट बँकेसाठीच काम करतात. त्यामुळे कधीकधी परिवर्तनाची गरज असते. १५ वर्षे तुम्ही एका नेत्याला संधी दिली, आता एका महिलेला संधी द्या.

एकीकडे उद्धव ठाकरे महिलांचा सन्मान करण्याबाबत बोलतात. तर दुसरीकडे, त्यांचेच शिलेदार अरविंद सावंत यांनी नुकतेच महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यावर तुमचे मत काय?

अरविंद सावंत असो किंवा संजय राऊत, ते नेहमीच ‘इम्पोर्टेड माल’, ‘आयटम’ आणि कधीकधी तर महिलांना बकरीसुद्धा म्हणतात. पण, हे त्यांना शोभत नाही. यातून त्यांची मानसिकता स्पष्ट होते. मात्र, मला महिलांचा पाठिंबा आहे आणि आई मुंबादेवीचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ‘मैं महिला हूं लेकीन माल नहीं, लडूंगी तो जितूंगी, लडेंगे तो झाँसी की रानी जैसे लडेंगे’.

मुंबादेवीमध्ये लोकसभेला ‘व्होट जिहाद’ झाल्याचा दावा करण्यात आला होता. तर यावेळीसुद्धा त्याचा काही फटका बसणार का?

महाविनाश आघाडी फक्त तुष्टीकरणाचे राजकारण करते. त्यांना व्होटबँक हवी आहे. त्यासाठी ते काहीही करतील. ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’सारख्या योजनेचा मुंबादेवीत आज ४० हजार महिला लाभ घेत आहेत. त्यात १५ हजार मुस्लीम महिलादेखील आहेत. परंतु, ते यावर कधीच बोलत नाहीत. केवळ यावर प्रश्न उपस्थित करतात. मात्र, आता त्यांच्या जाहीरनाम्यात आम्ही पैसे डबल करू असे ते सांगतात. त्यामुळे ही त्यांची डबलढोलकी आहे. पण, यात न पडता मला फक्त मुंबईकरांसाठी काम करायचे आहे आणि मुंबादेवी माझी लाडकी आहे.